आरोग्यनामा ऑनलाइन टीम – नकारात्मक विचार, भावनांमुळे व्यक्तीच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याचे मोठे नुकसान होते. चिंता, क्रोध, इर्षा, राग, चुकीचे विचार, शत्रुत्व, सूड, चिडचिडेपणा, खंत आणि नैराश्य असे वाईट विचार शरीरावर विपरीत परिमाण करतात. यामुळे विविध आजार लवकर जडतात. नकारात्मक भावनेमुळे नकारात्मक विचार वाढतात असे संशोधकांनी म्हटले आहे.
दीर्घकाळापर्यंत अपराधीपणाची भावना कायम राहिल्यास शरीराची ऊर्जा कमी होते. शत्रुत्वाची भावना मनात दाबून ठेवल्यास शरीराच्या विविध भागांत दुखण्याचा त्रास जास्त होतो. तर मानसिक तणाव झाल्यावर डोकेदुखी आणि सर्दीचा त्रास होऊ शकतो. क्रोध, भीती किंवा तणावामुळे उच्च रक्तदाब होऊ शकतो. कॅन्सर, हृदयविकार आणि इन्सोम्नियासारख्या आजारांचे मूळ कारण नकारात्मक भावना आणि विचार हेच असते.
नकारात्मक भावनांना वेळीच मनातून दूर केले नाही तर मोठय़ा आणि गंभीर समस्या निर्माण होऊ शकतो. नकारात्मक भावनांमुळे व्यक्ती एखाद्या कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाही. मन सदैव अस्वस्थ राहते. नकारार्थी विचारामुळे व्यक्तीचा आत्मविश्वास कमी होतो आणि तो कोणतेही काम चांगल्याप्रकारे विश्वासाने पूर्ण करू शकत नाही. भीती, तणाव आणि खंत यांसारख्या भावना असुरक्षिततेची भावना निर्माण करते. अशाने व्यक्तीमधील आत्मविश्वास कमी होतो.
चिडचिडेपणाने विविध अॅलर्जीचा त्रास होऊ शकतो. मन स्वस्थ राहत नाही. यासाठी गुड फॅट म्हणजे शेंगा, मासे, ऑलिव्हचे सेवन करावे. ध्यानधारणेचा देखील यात फायदा होतो. तसेच पश्चात्तापामुळे शरीर आणि प्रतिकारशक्ती कमकुवत होते. परिणामी अनेक आजार होऊ शकतात. यासाठी चेस्टनट जास्त प्रमाणात खावे आणि संगीत ऐकावे. अपराधीपणाची भावना वाढल्यास अथवा एखाद्या चुकीच्या कामाची खंत वाढत राहिल्यास त्याचा थेट परिणाम हृदयावर होतो. अशा त्रासातून मुक्ती मिळण्यासाठी सकाळी हिरव्या गवतावर चालावे किंवा काही वेळ त्यावर झोपावे. हे करताना कोणताही विचार मनात आणू नये.
तसेच पैसा, करिअर, परीक्षा किंवा स्वकीयांविषयी चिंता होणे स्वाभाविक असते. मात्र, जास्त चिंता केल्याने रक्तातील साखरेचे प्रमाण वाढण्याची शक्यता असते. यासाठी कॉफी, चहा आणि साखर घेणे कमी करावे. सूप किंवा इतर पातळ पदार्थ आहारात घ्यावे. शिवाय, मत्सराचा मानवी यकृत आणि जठरावर विपरीत परिणाम पडतो. यासाठी दररोज सकाळी उठल्यानंतर गरम पाण्यात लिंबूचा रस आणि मध मिसळून प्यावे.