आरोग्यनामा ऑनलाइन टीम – जागतिक आरोग्य संघटनेने दिलेल्या इशाऱ्यानुसार मोबाईलच्या अतिवापरामुळे ब्रेन कँन्सरचा धोका होऊ शकतो. मोबाईलवर कॉल आल्यानंतर संभाषण करण्यासाठी तो कानाला लावला जातो. त्यामुळे मोबाईलमधून बाहेर पडर्णाया रेडिओ फ्रिक्वेन्सी इलेक्ट्रोमॅग्नेटिक फिल्ड मेंदूत शिरतात. यामुळे मेंदूचा कर्करोग होण्याचा धोका असतो. हा धोका टाळण्यासाठी टेक्सट मेसेज, ईअरफोन असलेल्या हँड्स फ्री उपकरणांचा वापर करण्याचा सल्लाही आरोग्य संघटनेच्या अभ्यासकांनी दिला आहे.
मोबाईलमधून निघणारे रेडिएशन एक्सरे सारखे नसते. मात्र ते कमी क्षमतेच्या मायक्रोवेव्ह रेडिएशनसारखे असते. याचा अर्थ मोबाइल कानाला लावून दीर्घकाळ बोलणे मायक्रोवेव्हमध्ये पदार्थ शिजवण्यासारखे असते. त्याचा स्मरणशक्तीवरही विपरीत परिणाम होऊ शकतो, असेही जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी सांगितले आहे. हा धोका टाळण्यासाठी मोबाईलपासून दूर राहणे खूप चांगले आहे. खूपच आवश्यक असल्यासच मोबाईलचा विशेष दक्षता घेऊन वापर केला पाहिजे. आपल्याकडे तर प्रत्येक माणसाच्या हातात अलिकडे मोबाईल दिसू लागला आहे. जवळपास सर्वच वयोगटातील व्यक्ती मोबाईचा वापर करताना दिसतात.
यामध्ये शाळकरी मुले आणि कॉलेजच्या मुलांचाही समावेश आहे. ही मुले सर्वात जास्त मोबाईलचा वापर करताना दिसतात. एवढेच नव्हे तर अनेक पालक नातेवाईकांचा फोन आल्यास लहान मुलांच्या कानाला मोबाईल फोन लावतात. काहीजण लहान मुलांना त्यांच्या आवडत्या व्यक्तीबरोबर बोलण्यासाठी मोबाईलवर फोन लावून देतात. तर काही लहान मुले स्वताच मोबाईलवरून फोन करून बोलताना दिसतात. याकडे आई-वडील फार गांभीर्याने पहात नाहीत. परंतु, ही सवय किती महागात पडू शकते हे त्याचे दुष्परिणाम पाहिले की कळते. यासाठी लहान मुलांच्या हातात मोबाईल देणे टाळले पाहिजे. शिवाय, त्याचा वापर गरजे पुरताच केला पाहिजे.