आरोग्यानामा ऑनलाइन टीम – व्हॉटसअप, फेसबुकवरसारख्या सोशल मीडियावर आलेले मेसेज कोणतीही पडताळणी करता प्रत्येकजण पुढे पाठवत असतात. यामुळे अनेकांना मनस्तापही भोगावा लागतो. अगदी विविध आजारांच्या उपचाराबाबतही असे फेक मेसेज अनेक उद्योगी लोक व्हायरल करत असतात. काही दिवसांपूर्वी कर्करोगावरील उपचाराबाबत टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या नावाने असाच एक फेक मेसेज व्हायरल झाला आहे.
यामध्ये म्हटले होते की, नारळ पाणी उकळून प्यायल्यास कर्करोग समूळ नष्ट होतो. विशेष म्हणजे टाटा हॉस्पिटलमधील एका डॉक्टरांच्या नावाने हा मसेज सर्वत्र फिरत होतो. यामुळे टाटा हॉस्पिटलनेच एक प्रसिद्धी पत्रक काढून हा मेसेज फेक असल्याचे व नारळ पाणी प्यायल्याने कर्करोग बरा होतो, हे खोटे असल्याचे म्हटले आहे. ज्यांच्या नावाने मेसेज व्हायरल झाला आहे ते टाटा कर्करोग रुग्णालयाचे संचालक डॉ. राजेंद्र बडवे यांनी पत्रकात म्हटले आहे की, टाटा हॉस्पिटल आणि माझ्या नावे सोशल मीडियावर जो मेसेज व्हायरल होते आहे तो साफ चुकीचा व खोटा आहे.
नारळ पाणी गरम करून प्यायल्याने कर्करोगाचा व ट्यूमरचा समूळ नाश होतो असा दावा या मेसेजमध्ये करण्यात आला आहे, तो साफ चुकीचा आहे. याविषयी कुठल्याही प्रकारचे संशोधन झालेले नाही. त्यामुळे सामान्य नागरिकांनी अशा कोणत्याही प्रकारच्या संदेश वा पोस्टची विश्वासार्हता पडताळल्याशिवाय विश्वास ठेवू नये अथवा फॉरवर्ड करू नये. यापूर्वी टाटा रुग्णालयाच्या नावे अशा अनेक व्हायरल पोस्ट्समुळे कर्करोगाविषयी चुकीचे समज पसरवले गेले आहेत. टाटा रुग्णालयाचे डॉ. मकरंद देशपांडे यांच्या नावेही असा चुकीचा संदेश व्हायरल झाला होता, मात्र या नावाचे कुणीही डॉक्टर रुग्णालयाशी संलग्न नाहीत.