आरोग्यनामा ऑनलाइन टीम – योग्य वयात गर्भधारणा होणे कधीही चांगले असते. तज्ज्ञदेखील अशाच प्रकारचा सल्ला देत असतात. कारण, महिलांचे वय जसे वाढत जाते तसतशी गर्भधारणेची शक्यता कमी होत जाते. पस्तिशीनंतर ही समस्या बहुतांश महिलांमध्ये आढळून येते. या वयात महिला मर्यादित बीजांडांची निर्मिती करू शकतात. काही महिलांमध्ये डीजनरेशन होते. अशा महिला आयुष्यभरात सुमारे ३०० बीजांडांची निर्मिती करू शकतात. तरुण महिलांची बीजांडे निरोगी असतात. वय वाढल्यामुळे निरोगी बीजांडांची संख्या कमी होऊ लागते. त्यातून मुले जन्मण्याची शक्यताही कमी होते.
योग्य तपासण्या करूनच घ्या निर्णय
तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार वयाच्या ३७ व्या वर्षानंतर सक्षम बीजांडे शरीरातून निघून जातात. काही महिलांच्या अंडाशयात जन्मापासूनच कमी बीजांडे असतात. त्यातून कमी वयात निकृष्ट बीजांडे बाहेर पडतात. काही कारणास्तव जास्त वयात गर्भधारणा करावी लागत असल्यास प्रथम तज्ज्ञ डॉक्टरांकडून चेकअप करून घेतले पाहिजे. त्यांच्या सल्ल्यानंतर गर्भधारणेचा निर्णय घ्यावा.
मधुमेह, थायरॉइड डिसऑर्डर, अॅनिमिया, इन्फेक्शन, व्हिटामिन टेस्ट करून घेतल्यानंतरच अशा महिलांनी गर्भधारणेचा विचार करावा. कारण हे आजार आईकडून मुलाला होऊ शकतात. डॉक्टर एफएसएच टेस्ट करतात. एफएसएचची पातळी जास्त असल्यास महिला गरोदर होण्याची शक्यता कमी होते. गर्भपात, उच्च रक्तदाब, मधुमेह असे विकारही गरोदरपणात होऊ शकतात.
कामाचा ताण आणि प्रजनन क्षमता
गर्भधारणेच्या सुरुवातीपासूनच वेळोवेळी स्त्रीरोगतज्ज्ञाकडून तपासणी केली पाहिजे. नोकरी-व्यवसाय करणाऱ्य़ा महिला उशिरा मातृत्वास पसंती देत असल्याने त्यांच्या गर्भधारणेत आणि नंतरही अनेक अडचणी येतात. तसेच कामाच्या तणावामुळे प्रजननक्षमतेची हानी होत असते. पुरुषांमध्येही वयाबरोबर शुक्राणूंच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. मधुमेहासारख्या आजाराचाही परिणाम होतो.