आरोग्यनामा ऑनलाइन टीम – पावसाळ्यात विविध आजार मोठ्याप्रमाणात पसरतात. यातील काही आजार हे संसर्गजन्य असल्याने घरातील सर्व सदस्यांना आजारणाचा त्रास होऊ शकतो. पावसाळ्यात माशांमुळे मोठ्याप्रमाणात आजार पसरण्याची भिती असते. लहान मुलांना या आजारांची लागण लवकर होते. घाणीवर बसून आलेल्या माशा घरात अन्नपदार्थ अथवा अंगावर बसल्याने आजार पसरतात. रोगराई पसरवणाऱ्या या माशांचा बंदोबस्त केल्यास अनेक आजार दूर ठेवता येतात.
बाहेरून रोगजंतू घेऊन येणाऱ्या माश्यांमुळे जुलाब, थंडीताप, टायफाईड, कॉलरा आणि गॅस्ट्रोइंट्रीटीस हे आजार होऊ शकतात. माशांना प्रतिबंध करण्यासाठी काही उपाय आहेत. यासाठी कापूर, तुळस, कडूलिंब, तेल, कापूर वापरता येतो. संध्याकाळी धूपासोबत कापूर जाळल्यास माशा कमी होतात. घरात चारही कोपऱ्यात कापराच्या गोळ्या टाकाव्यात. माश्या खूप असतील तर कापूर जाळावा. कापराच्या वासामुळे माशा कमी होतात. तुळशीचा वापर करूनही माशांचा उपद्रव कमी करता येतो. तुळशीत औषधी गुणधर्म असल्याने कीटक दूर राहतात.
घरात तुळशीचे रोप लावल्यास माश्यांचा वावर कमी होतो. तसेच निलगिरी, लव्हेंडर, पेपरमिंट, गवती चहाच्या नैसर्गिक तेलांनी कीटकांना दूर ठेवता येते. या तेलामध्ये कापसाचा बोळा बुडवून तो ठेवावा.
माशांचा उपद्रव टाळण्यासाठी घर नेहमी स्वच्छ ठेवावे. विशेष करून स्वयंपाक घर स्वच्छ ठेवावे. स्वयंपाक गृहात अन्न झाकून ठेवावे. ब्लिच बेस्ड किंवा क्लोरिन बेस्ड क्लिनर्सचा वापर करून किचनचा ओटा स्वच्छ ठेवावा. घराच्या खिडक्या आणि दारे शक्यतो बंद ठेवावीत. बाहेरून आल्यावर हात-पाय स्वच्छ धुवावेत. कीटकांचा नाश करण्यासाठी इंसेक्ट रेपेलंट स्प्रे मारावा.