आरोग्यनामा ऑनलाइन टीम – वातावरणातील बदलांमुळे विविध आजार उद्भवतात. त्यावर दुष्परिणाम टाळून रोगप्रतिकार शक्ती वाढविणारी होमिओपॅथी औषधे रामायणातील संजीवनी औषधाप्रमाणे काम करते, असे प्रतिपादन सुप्रसिद्ध होमिओपॅथी तज्ज्ञ आणि लुधियाना होमिओपॅथी मेडिकल कॉलेजचे प्रमुख प्रा. डॉ. मुक्तिंदर सिंग यांनी केले. नागपूर होमिओपॅथी संघटनेतर्फे आयोजित परिषदेत ते बोलत होते. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. एम. ए. राव, राज्य अध्यक्ष डॉ. हरीश धुरट विशेष अतिथी होते. तर, स्थानिक शाखेचे उपाध्यक्ष डॉ. अजय डहाट, डॉ. निशिकांत थापे व्यासपीठावर उपस्थित होते.
डॉ. मुक्तिंदर सिंग म्हणाले की, वैद्यकीय उपचाराच्या विविध पद्धतीप्रमाणेच होमिओपॅथी हीसुद्धा स्वतंत्र पॅथी आहे. मि ओपॅथीमध्ये आजाराबाबतचा रुग्णाचा इतिहास समजून उपचार केले जातात. त्यामुळे होमिओपॅथीचा शरीरावर परिणाम होत नाही. त्यातच या पॅथीच्या औषधोपचारामुळे रुग्णाची प्रतिकारशक्ती सुधारते. राज्य व केंद्र शासनाने होमिओपॅथीला धोरणात महत्त्व दिल्यास त्याचा नागरिकांना लाभ शक्य आहे. ऋतूबदलाचा मानवी शरीरावर परिणाम होतो. पावसाळ्यात आबालवृद्धांना कीटकजन्य आजारांच्या संसर्गाचा धोका उद्भवू शकतो. त्यामुळे आजार बळावण्यापूर्वीच डॉक्टरांचा सल्ला आणि त्वरित औषधोपचार करावा. प्रतिकार शक्ती कमी असल्याने लहान मुलांवर वातावरण बदलाचा परिणाम लवकर होतो. त्यामुळे त्यांच्यातील आरोग्यविषयक स्थित्यंतराकडे विशेष लक्ष दिले पाहिजे, असे डॉ. मुक्तिंदर सिंग म्हणाले.