आरोग्यनामा ऑनलाइन टीम – बदाम, अक्रोड, काजू इत्यादी सुक्या मेव्यामध्ये भरपूर प्रमाणात भरपूर पोषक घटक असतात. हे घटक शरीरासाठी खूप आवश्यक असतात. शिवाय यामध्ये कोलेस्टेरॉलही नसते. सुक्या मेव्यात आरोग्यदायी घटक, प्रथिने, जीवनसत्त्वे, अॅटी-ऑक्सिडंट्स विपुल प्रमाणात असतात. बदाममध्ये सर्वाधिक कॅल्शियम असते. अक्रोडमध्ये ओमेगा-३ जास्त असते.
सुका मेवा तळल्यामुळे त्यातील ब आणि ई जीवनसत्त्व तसेच आवश्यक फॅटी अॅसिड्स नष्ट होतात. त्यामुळे सुका मेवा न तळता खावा. हलका भाजून खाता येईल. हे पदार्थ मूळ स्वरूपात खाल्ल्यास त्यातील पोषक घटक तसेच राहतात. सुक्या मेव्यातील तंतू, प्रथिने आणि फॅटमुळे मन प्रसन्न राहते. बदामात अॅमिनो आम्ल असल्याने हार्मोन स्रवतात आणि भूक नियंत्रित राहते. या आम्लाने नैराश्य दूर होते.
मानसिक दृष्टीने सतर्कता वाढते. सुका मेवा खाल्ल्यामुळे हृदयरोग, उच्च रक्तदाब, मधुमेह, कर्करोग, अस्थमा इत्यादी आजार रोखण्यास मदत होते. सुक्या मेव्यामुळे शरीरातील प्रतिकार शक्ती बळकट होते. तारूण्य टिकते, त्वचा आणि केस सुदृढ होतात. उत्तम डोळ्यांसाठी सुका मेवा फायद्याचा ठरतो. दररोज ३० ग्रॅम बदाम खाल्ल्याने हृदयरोग आणि मधुमेहाची जोखीम कमी होऊ शकते, असे तज्ज्ञ सांगतात.
सुका योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीनेच सेवन केला पाहिजे. जास्त सुका मेवा खाण्याने वजन वाढू शकते. पचनव्यवस्था कमकुवत होऊ शकते. हे पदार्थ मूळ स्वरूपातच खाता येतात. मात्र, काही तास पाण्यात भिजवून खाल्ल्यास ते सहज पचतात. हे पदार्थ भिजवून खाल्ल्यामुळे शरीरातील दाह कमी होतो, असे आयुर्वेदात म्हटले आहे.