पुणे : आरोग्यनामा ऑनलाइन – जखम बरी करण्यासाठी अनेक घरगुती उपाय आहेत. घरात सहज उपलब्ध असणारे पदार्थ वापरून आपण जखम बरी करण्याचे उपचार करू शकतो. मध, हळद, बटाटा, लसूण, कोरफड वारून आपण जखम बरी करू शकतो. चालताना, खेळताना पडल्यानंतर, भाजी चिरताना, फळे कापताना बोट कापल्यानंतर त्यावर हळद लावली जाते. हळद जंतूनाशक असून त्यामुळे रक्तस्रावही थांबाते.
घरगुती उपचार करण्यापूर्वी आधी साबण आणि पाण्याने जखम स्वच्छ करून घ्यावी. त्यानंतर सांगितलेले पदार्थ जखमेवर लावावेत. यामुळे जखम बरी होण्यास मदत होईल. मध हे इन्फेक्शन वाढविणाऱ्या बॅक्टेरियांना मारते. तसेच वेदनांपासूनही आराम देते. अन्य स्किन अँटिबायोटिक्सपेक्षा मध खूप परिणामकारक आहे. परंतु, हे मध शुद्ध असले पाहिजे. प्रक्रिया केलेल्या मधातील अँटिबॅक्टेरिअल घटक नाश पावलेले असतात.
लसूणदेखील जखमेवरील उपचारासाठी लाभदायक आहे. लसूण ठेचल्यानंतर बाहेर येतो त्या चिकट द्रवास अलिसिन असे म्हणतात, हा लसणीतील अँटिबॅक्टेरिअल घटक असून छोटी जखम झाल्यास त्यावर लसणीच्या पाकळ्या ठेचून लावाव्यात. २० मिनिटांनंतर ते पाण्याने धुवावे. यापेक्षा जास्त वेळ लसूण जखमेवर ठेवू नये नाहीतर त्वचेच्या टिश्यूंना हानी पोहोचू शकते आणि जखम बरी होण्याची प्रक्रियाही मंदावते. बटाटा किसून एका कपड्यात गुंडाळावा. हा कपडा जखमेभोवती बांधावा. प्रत्येक ४ तासांनी बटाट्याचा किस आणि कपडा बदलावा. रात्रभरदेखील तुम्ही असे बांधून ठेवल्यास जखम लवकर बरी होईल. कोरफडदेखील जखमेवर गुणकारी आहे.
कोरफडीच्या गरात अँटिसेप्टीक घटक असतात, त्यामुळे इन्फेक्शन होत नाही. कोरफडीमध्ये असलेल्या व्हिटॅमिन ई मुळे जखम लवकर बरी करण्यास मदत होते. कोरफडीचा गर थेट जखमेवर लावावा. दर २ तासांनी ही प्रक्रिया करावी. खोबरेल तेलातही अँटिबॅक्टेरिअल घटक असतात. खोबरेल तेल थेट जखमेवर लावल्यास बॅक्टेरिया आणि इन्फेक्शन वाढत नाही. जखमेचे व्रणही राहत नाही. जखम बरी झाल्यानंतर त्यावर नियमित खोबरेल तेल लावल्यास व्रण दूर होतात.