आरोग्यनामा ऑनलाइन टीम – चूकीचा शॅम्पू लावणे, मानसिक ताण या कारणांमुळेच केस गळतात, असे नसून केस गळण्यास अयोग्य आहार सुद्धा तेवढाच जबाबदार असतो. अशावेळी खाण्यापिण्याच्या माध्यमातून केसांचे पोषण केले जाऊ शकते. यासाठी दूध, पनीर, चीज, दही आणि मठ्ठा अशा दुग्धजन्य पदार्थांचे भरपूर सेवन करावे. कारण यामुळे पोषक द्रव्यांची पूर्तता होते. साधारणपणे शरीरातील पोषक द्रव्यांच्या कमतरतेमुळेच केसांची मूळे कमजोर होऊन केस गळतात.
अ जीवनसत्त्व असलेल्या खाद्यपदार्थांचे भरपूर सेवन केल्याने दाट केसांसाठी अत्यंत आवश्यक असणाऱ्या हेअर फॉलिकल्सची संख्या वाढते. अंडी, काशीफळ आणि गाजर यातून ते मिळते. अल्कोहोलचे सेवन करणे किंवा धूम्रपान यासारख्या वाईट सवयींपासून दूर राहावे. यामुळे केस कमकुवत होऊन गळू लागतात. धूम्रपान केल्यास केसांच्या मुळांना होणारा रक्तप्रवाह कमी होतो, आणि केसांची वाढ खुंटते. केसांचे पोषण करण्यासाठी ई जीवनसत्त्व अत्यंत आवश्यक आहे. तसेच ब जीवनसत्त्वही केसांसाठी उपयोगी असते. याच्या सप्लीमेंट्सचे सेवन केल्यास केसांचे चांगले पोषण होऊन ते दाट होतात.
भरपूर पाणी पिल्यासही केसांच्या मुळांना बळकटी मिळते. यामुळे शरीर सजल राहते आणि केसांचा विकासही होतो. आंबट फळे आणि भाज्या जसे मोसंबी, संत्रा, लिंबू, हिरवी मिरची, टोमॅटो यांचे भरपूर सेवन करावे. यामध्ये क जीवनसत्त्व भरपूर असते. या जीवनसत्त्वाची दररोज १००० ते ३००० मिलिग्रॅम या प्रमाणात पूर्तता होणे आवश्यक असते. आवळ्यामुळे केसांचे मूळ बळकट होतात. त्यामुळे आवळ्याचेही भरपूर सेवन करावे. लोह असलेल्या भाज्यांचे भरपूर सेवन करावे. यामुळे डोक्याच्या त्वचेतील रक्तप्रवाह वाढण्यासोबतच केसांच्या मुळांनाही पोषण मिळते. यासाठी पालक, बीट, मनुका आणि अँप्रिकॉट्स यांचेही सेवन करावे.