आरोग्यनामा ऑनलाइन टीम – डोळ्यांची निगा न राखणे, शरीरात पोषक तत्वांची कमतरता किंवा अनुवंशिकता आदी कारणांमुळे चष्मा लागतो. अनुवंशिकतेचे कारण सोडल्यास इतर कारणांमुळे लागलेला चष्मा, आहाराची काळजी घेतल्यास आणि काही घरगुती उपचार केल्यास दूर होऊ शकतो. अलिकडे लहान मुलांनाही चष्मा लागल्याचे सर्रास दिसून येते. चष्मा वापरणे त्रासदायक असूनही अनेकांना तो वापरावा लागतो. परंतु डोळ्याला लागलेला चष्मा काही उपाय केल्यास जाऊ शकतो.
करा हे उपाय
* कानाच्या वरील बाजूस गाईच्या शुद्ध तुपाने थोडावेळ हलक्या हाताने मालिश केल्यास डोळ्यांची शक्ती वाढते.
* शेंगदाण्याच्या आकाराएवढी तुरटी गरम करून त्याची पूड करावी. शंभर ग्रॅम गुलाबपाण्यामध्ये ही पूड टाकावी. दररोज संध्याकाळी या गुलाबपाण्याचे चार-पाच थेंब डोळ्यात टाकावे. पायाला शुद्ध तुपाने मालिश करावी. हा उपाय केल्यास चष्म्याचा नंबर कमी होतो.
* बदामाची पूड, बडीशेप आणि बारीक खडीसाखर सम प्रमाणात एकत्र करून घ्यावी. दररोज एक चमचा हे मिश्रण एक ग्लास दुधात टाकून रात्री झोपण्यापूर्वी घ्यावे.
* डोळ्यातून पाणी येणे, डोळे येणे, डोळ्यातील दुर्बलता असे त्रास असतील तर रात्री आठ बदाम भिजवून ठेवावेत. सकाळी बदाम बारीक वाटून पाण्यामध्ये मिसळून ते पाणी प्यावे.
* केळी, ऊस डोळ्यासाठी लाभदायक असून ऊसाचा रस पिल्यास चांगला गुण येतो. एका लिंबाचा रस एक ग्लास पाण्यामध्ये टाकून पिल्यास आयुष्यभर डोळे चांगले राहतात.
* पायाच्या तळव्यांना मोहरीच्या तेलाने मालिश करून झोपावे. सकाळी अनवाणी पायाने हिरव्या गवतावर थोडावेळ चालावे. अनुलोम-विलोम प्राणायाम केल्यास डोळ्यातील कमजोरी दूर होते.
* १५ ते २० मि.ली. आवळ्याचा रस व एक चमचा मध मिसळून हे चाटण घेतल्यास दृष्टी तीक्ष्ण होते. आवळ्याचा रस आणि शुद्ध मध समप्रमाणात घेऊन मिसळावे. या मिश्रणाचे दररोज रात्री डोळ्यांना अंजन केल्यास डोळ्यांचा अंधुकपणा जातो.
* त्रिफळा चूर्ण रात्री पाण्यामध्ये भिजवून सकाळी हे पाणी गाळून प्यावे. या पाण्याने डोळे धुतल्यास दृष्टी चांगली होते.
* लिंबू आणि गुलाबपाणी यांचे समान मात्रेतील मिश्रण एक-एक तासाच्या फरकाने डोळ्यात टाकल्यास डोळ्यांना थंडावा मिळतो.
* थंड काकडी किंवा बटाट्याचे स्लाईस कापून दहा मिनिट डोळ्यावर ठेवावे. पाणी जास्त प्रमाणात प्यावे. पाण्याच्या कमतरतेमुळे डोळ्यांवर सूज दिसते.
* कृष्ण तुळशीच्या पानांचा दोन-दोन थेंब रस १४ दिवस डोळ्यांमध्ये टाकल्यास रातांधळेपणा दूर होतो.
* १ ते २ हळकुंड तुरीच्या डाळीमध्ये उकळून, सावलीत वाळवून, पाण्यामध्ये उगाळून सूर्यास्तापूर्वी दिवसातून दोन वेळेस डोळ्यात काजळाप्रमाणे लावल्यास डोळयांचे आरोग्य सुधारते.
* रात्री झोपण्यापूर्वी डोळ्यात मधाचे दोन थेंब टाकून डोळ्यातून पाणी गाळल्यास डोळे स्वच्छ होतात. दृष्टी तीक्ष्ण होते.