आरोग्यनामा ऑनलाइन टीम – शरीरातील हार्मोन्सची पातळी बिघडली की विविध प्रकारचे त्रास सुरू होतात. विशेषता अशा प्रकारच्या समस्या महिलांमध्ये अधिक प्रमाणात दिसून येतात. यासाठी हार्मोन्सची पातळी नियंत्रित राहणे गरजेचे आहे हार्मोन्सची अनियमितता झाल्यावर महिलांना अनेक आरोग्य समस्यांचा सामना करावा लागतो. हार्मोनल बदल नियंत्रित करण्यासाठी साधारणत: करण्यात येणाऱ्या हार्मोन रिप्लेसमेंट थेरपीपेक्षा नैसर्गिक उपाय करणे अधिक चांगले आहे. नैसर्गिक उपाय केल्यास काणताही साईड इफेक्ट होण्याची शक्यता नसते.
हार्मोन्सची पातळी बिघडली की शरीरात अनेक लक्षणे दिसून येतात. ही लक्षणे ओळखता आल्यास वेळीच औषधोपचार करून आजार बरा करता येऊ शकतो. उपचार करण्यास खूप उशीर झाला असल्याचे अनेक महिलांना माहीतच नसते. अनियमित मासिक पाळी, मूड खराब होणे, थकवा येणे आणि वारंवार पोट खराब होणे यासारखी लक्षणे हार्मोन्सशी निगडित असून या समस्यांकडे नेहमीच दुर्लक्ष केले जाते.हामोन्सची पातळी बिघडल्याची लक्षणे आढळून आल्यास ताबडतोब डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घेतली पाहिजे. परंतु, याकडे दुर्लक्ष करण्याची प्रवृत्ती जास्त आहे.
डॉक्टर अनेक चाचण्या केल्यानंतर होर्मोन्स बाबतचे पुढील उपचार करतात. ही समस्या उद्भवण्यामागे तणावसुद्धा कारणीभूत असतो. महिलांच्या शरीरातील हार्मोन्सच्या नैसर्गिक चक्रावर तणावाचा परिणाम होतो. तज्ज्ञांच्या मते, ज्या गोष्टींमुळे तणाव निर्माण होतो, त्यापासून दूरच राहावे. तसेच रात्री पुरेशी झोप घ्यावी आणि रिलॅक्स होण्यासाठी ध्यानसाधना करावी. महिन्यातून एक किंवा दोनवेळा बाहेर फिरायला जावे. नियमित व्यायाम केला पाहिजे. आठवड्यातून एकदा मैलभर चालले पाहिजे. हिरव्या पालेभाज्या आणि सर्व प्रकारच्या आंबट फळांचे नियमित सेवन करावे. सुका मेवा, सर्व प्रकारच्या धान्यांपासून तयार करण्यात आलेल्या खाद्यपदार्थांचा जेवणात समावेश करावा. अशाप्रकारे काळजी घेतल्यास हार्मोन्सची पातळी नियंत्रित ठेवता येऊ शकते. तसेच हार्मोन्स नियंत्रित झाल्यास आजारही दूर होतात.