आरोग्यनामा ऑनलाइन टीम : शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता निर्माण झाल्यास अनेक प्रकारचे त्रास सुरू होतात.याच्या कमतरतेमुळे शरीर कमजोर होते, त्वचेमध्ये पिवळेपणा, चक्कर येणे, तंद्री लागणे, आणि थकवा इत्यादी त्रास होतो. पुरुषांच्या तुलनेत महिलांना हा त्रास जास्त होतो. महिलांच्या शरीराला लोहाची जास्त आवश्यकता असते. हे लोह सामान्य खाद्यपदार्थांमधून शरीराला मिळत नाही. यासाठी हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढवण्यासाठी आहारात बदल करणे गरजेचे असते. कोणते पदार्थ खाल्लानंतर हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढते, ते आपण पाहणार आहोत.
अॅनिमियावर घरगुती उपाय करताना टोमॅटो अत्यंत उपयुक्त आहे. टोमॅटोमधील पोषक द्रव्यांमुळे शरीर मजबूत होते. नियमितपणे १ ग्लास टोमॅटोचा रस पिल्याने रक्ताची कमतरता राहत नाही.टोमॅटोचे सूप किंवा टोमॅटोसोबत सफरचंदाचा रस मिसळून पिल्यानेदेखील लवकर फायदा मिळतो. तसेच शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी नियमित पेरू खाणे लाभदायक आहे. जास्त पिकलेला पेरू अधिक लाभदायक ठरतो. आतून गुलाबी किंवा लाल असलेला पेरू रक्त निर्मितीसाठी गुणकारी आहे. अशा पेरूंचे सेवन केल्याने हिमोग्लोबिनची पातळी वेगाने वाढते.
तसेच मक्याच्या पिठापासून बनलेली भाकर खाल्ल्याने लठ्ठपणा नियंत्रणात राहतो आणि मक्याचे दाणे खाल्ल्याने शरीरात हिमोग्लोबिनची पातळीही वाढते. वस्तुत: मक्याचे दाणे खूप पौष्टिक असतात आणि त्यात लोहदेखील भरपूर असते. दाणे उकळून किंवा भाजून खाल्ल्याने शरीरातील रक्ताची कमतरता राहत नाही. तसेच शरीरातील रक्त वाढवायचे असेल तर सर्वात आधी बीटचे नाव घेतले जाते. हे फळ कच्चे सलाड बनवून किंवा याचा ज्यूस बनवून पिल्याने फायदा होतो. मात्र, वेगाने रक्त वाढवायचे असेल तर याच्या रसात थोडे मध टाकून सेवन करावे. यामुळे शरीराला मोठ्या प्रमाणात लोह मिळते. पालकसुद्धा रक्ताची कमतरता दूर करण्यामध्ये उपयोगी असून ते औषधासारखे काम करते. यात व्हिटॅमिन ए, सी, बी९, लोह, फायबर आणि कॅल्शियम इत्यादी घटक मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे शरीरात २० टक्क्यांपर्यंत लोहाचे प्रमाण वाढू शकते. पालकाचे सेवन सूप किंवा भाजी बनवून करता येईल.