आरोग्यनामा ऑनलाइन – संपूर्ण राज्यात सध्या उन्हाचा तडाखा वाढला आहे. मागील चार ते पाच दिवांपासून तर उकाड्याने महाराष्ट्र हैराण झाला आहे. अशा कडक उन्हात उष्माघाताचा त्रास झाल्याने आतापर्यंत ७ जणांनी प्राण गमावले असून ४३८ रुग्णांवर विविध रुग्णालयांत उपचार सुरू आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. राज्यभरातील नागरिकांनी उष्माघातापासून वाचण्यासाठी काळजी घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
उष्णता मोठ्याप्रमाणात वाढल्याने राज्यात अनेक ठिकाणी ४५ अंश सेल्सिअसच्या पुढे तापमान गेले आहे. अकोला, अमरावती, नांदेड, नागपूर, नाशिक, सोलापूर, बुलढाणा, चंद्रपूर आणि बीड या शहरात सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. या प्रचंड तापमानामुळे उष्माघाताचे रूग्ण वाढत आहेत. मार्च ते मे २०१९ या तीन महिन्यांत राज्यात उष्माघातामुळे सात जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४३८ जणांवर राज्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अकोला आणि नागपूरमध्ये उष्माघाताचे सर्वात जास्त रूग्ण आढळले आहेत. अकोल्यात १८६ तर नागपूरमध्ये १५६ रुग्णांवर उष्माघाताचे उपचार सुरू आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात ६, लातूर ६६, नाशिक २३ तर पुण्यात एक रुग्णाला उष्माघाताचा त्रास झाल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले. तसेच औरंगाबाद, हिंगोली येथे प्रत्येकी दोन तर परभणी, धुळे आणि बीड शहरात प्रत्येकी एक अशा सात जणांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे.
राज्यभरात तापमान मोठ्याप्रमाणात वाढले असून विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागात उष्णतेची लाट आहे. या लाटेमुळे उष्माघाताच्या धोका वाढला आहे. मार्च ते मे या कालावधीत राज्यात उष्माघातामुळे सात जणांनी जीव गमावला आहे. तर ४३८ जणांवर उपचार सुरू आहेत. यासाठी नागरिकांची काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. शक्यतो दुपारी बाहेर जाण्याचे टाळावे, असा सल्लाही देण्यात आला आहे.
उष्माघातापासून वाचण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. दररोज किमान ८ ग्लास पाणी प्यायला हवे. थंड पाण्याने आंघोळ करावी. हलका आणि पोषक आहार घ्यावा. आहारात काकडी, कलिंगड, नारळ या पदार्थांचा समावेश करावा. सैल कपडे आणि कॉटनचे कपडे घालावे. बराच काळ बाहेर राहिल्यास त्वचा किंवा कपड्यांवर थोडे पाणी शिंपडावे. सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळेत बाहेर जोण शक्यतो टाळावे. बाहेर जावे लागल्यास छत्री किंवा टोपीचा वापरावी. अतिरिक्त मद्यपान, साखरयुक्त पेये, कॅफेन जास्त असलेली पेय टाळावीत. अशा पेयांमुळे शरीरातील पाण्याची पातळी कमी होत असते. अतिप्रमाणात व्यायाम आणि अधिक उष्ण काळात बाहेर व्यायाम करू नये. विशेषता लहान मुले आणि वृद्धांची काळजी घ्यावी.