आरोग्यनामा ऑनलाइन टीम – अलिकडे हृदयरोगांमध्ये मोठी वाढ होत असल्याचे विविध सर्वेक्षणातून समोर येत आहे. याची कारणे विविध असली तरी हृदयाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केल्याने हे आजार होत असतात. हृदय निरोगी असेल तर आयुष्य भरपूर, असेच समजले जाते. म्हणूनच हृदयाच्या आरोग्याकडे लक्ष दिले पाहिजे. हृदयाच्या आरोग्यासाठी खूप जास्त प्रयत्न करण्याची गरज नाही. काही सामान्य गोष्टी लक्षात ठेवल्या तरी हृदयाला निरोगी ठेवता येते.
हृदयाच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. आहारात काही बदल केल्यास हृदयविकाराचा झटका आणि हृदयविकारांपासून बचाव करता येतो. तसेच तणावामुळे हृदयविकारांचा धोका अप्रत्यक्षरीत्या वाढतो. तणाव वाढल्याने रक्तदाब वाढतो आणि यामुळे हृदयापर्यंत रक्ताचा पुरवठा अचानकपणे वाढतो. तसेच हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. योगासने आणि आध्यात्माच्या मदतीने शारीरिक आणि मानसिकरीत्या निरोगी राहता येते. कोणत्याही प्रकारच्या व्यसनाचा थेट हृदयावर परिणाम होतो. अल्कोहोलमुळे झोपमोड होते. तसेच तणाव आणि तणावामुळे रक्तदाब वाढतो. हे हृदयासाठी अत्यंत घातक आहे. भरपूर झोप घेतल्याने कोलेस्टेरॉल नियंत्रित राहतो. तसेच यामुळे उच्च रक्तदाबाच्या समस्येतूनही सुटका होते. हृदय निरोगी ठेवण्यासाठी या दोन्हीही गोष्टी फायदेशीर आहेत. एका सामान्य व्यक्तीने दिवसभरातून कमीत कमी सात ते नऊ तासांची झोप घेतली पाहिजे.
मिठाचे जास्त सेवन केल्याने त्याचा थेट परिणाम रक्तदाबावर होतो. शरीरात मिठाचे प्रमाण वाढल्याने उच्च रक्तदाबाच्या समस्येचा सामना करावा लागतो. यामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोकाही वाढतो. हृदयाला या धोक्यापासून वाचवण्यासाठी जेवणात मिठाचे प्रमाण कमी करावे. जीवनसत्त्वे आणि मिनरल्सचे सप्लिमेंट्स घेणे हृदयविकारांपासून बचाव करण्याची सोपी पद्धत आहे. कोलेस्टेरॉल पातळी कमी करण्यासाठीही बाजारात भरपूर औषधे उपलब्ध असून डॉक्टरांच्या सल्ला घेऊन औषधांचे सेवन करावे.