आरोग्यनामा ऑनलाइन टीम – विशेष काळजी घेतली तर हृदयविकाराचा अचानक येणारा झटका रोखता येऊ शकतो, असे तज्ज्ञांचे मत आहे. हृदयविकाराचा झटका येण्याच्या धोक्याची सूचना देणारे प्रसंग आयुष्यात येतात, असे एका संशोधनात आढळून आले आहे. अशी सूचना मिळाल्यास आपण हृदयविकाराचा झटका रोखता येणे शक्य असल्याचे तज्ज्ञ सांगतात. अलिकडे हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू होण्याचे प्रमाण खूपच वाढले आहे. बदललेली जीवनशैली यास मोठ्याप्रमाणात कारणीभूत आहे. योग्य आहार, व्यायाम न घेतल्याने तसेच सतत तणावाखाली काम केल्याने हृदयरोग बळावतात. यासाठी वेळीच योग्य ती काळजी घेतली पाहिजे. हृदयविकाराचा झटका येण्याचे कारण, वेळ आणि तो रोखण्यासाठी केले जाणारे उपचार याविषयी माहिती करून घेऊयात.
हृदयविकाराचा झटका सोमवारी सकाळी येण्याचे प्रमाण २० टक्के एवढे आहे, हे शास्त्रीयदृष्ट्या सिद्ध झाले आहे. सोमवार हा आठवड्याचा पहिला दिवस असल्याने अनेकजण त्यादिवशी कामावर रुजू होण्याचा विचार करीत चिंताग्रस्त असतात. हा धोका टाळण्यासाठी रविवारी शारीरिक आणि मानसिकरीत्या शांत व चिंतामुक्त राहावे. तसेच शनिवार आणि रविवारी रात्री उशिरा झोपू नये. कारण अशावेळी शरीराचा थकवा कायम राहील आणि पुढच्या दिवशी रक्तदाबही वाढेल. ही काळजी घेतली तर हृदयविकाराचा झटका रोखण्यात २० टक्के यश येऊ शकते. एका संशोधनानुसार, जेवणात अती चरबी, अती कार्बोदकांचा समावेश केल्यास रक्तवाहिन्या आकुंचन पावतात. तसेच रक्तात हृदयविकाराचा झटका येण्याचे प्रमुख कारण असलेल्या रक्तांच्या गाठीचा धोकाही वाढतो. यासाठी अशा खाद्यपदार्थांचे सेवन करू नये. जर अवेळी जेवण करण्याची सवय असेल तर दिवसातून थोडे थोडे जेवण करावे.अॅस्प्रिन गोळी घेतल्याने रक्तातील चिकट पदार्थ नियंत्रित राहतो. बाऊल मुव्हमेंट म्हणजे पोट साफ होण्याच्या प्रक्रियेदरम्यान व्यक्तीला हृदयरोगांचा धोका अधिक असतो. या वेळी छातीवर दाब वाढतो आणि हृदयातून इतर अवयवांना होणारा रक्तप्रवाह मंद होऊ लागतो. हा धोका टाळण्यासाठी जेवणात भरपूर फायबर म्हणजेच तंतुमय खाद्यपदार्थांचा समावेश करावा. तसेच पुरेसे पाणी प्यावे. यामुळे पोट साफ होईल आणि हृदयावर पडणारा दाब कमी होईल. तसेच अनेक लोकांसमोर भरलेल्या सभागृहात भाषण देणे हा सुद्धा हृदयासाठी एक व्यायाम आहे. ज्या लोकांना अशी सवय असते आणि ज्यांना सार्वजनिक ठिकाणी काही बोलावे लागल्यास त्यांच्या हृदयाचे ठोके वाढतात, तसेच रक्तदाब आणि अँड्रोनलिनची पातळीही वाढते. अशा परिस्थितीत जेव्हा व्यक्ती जास्त चिंतेत असते आणि घाबरते तेव्हा त्या व्यक्तीसाठी बिटा ब्लॉकर फायदेशीर सिद्ध होऊ शकते.
हॉर्वर्ड विद्यापीठातील संशोधकांच्या मते, सकाळच्या वेळी हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका ४० टक्के अधिक असतो. या वेळी शरीरात अँड्रोनलिन आणि इतर स्ट्रेस हार्मोन अधिक सक्रिय असतात. यामुळे रक्तदाब वाढतो आणि शरीराला अधिक ऑक्सिजनची गरज भासू लागते. हृदयरोग्यांचे रक्त निरोगी लोकांच्या तुलनेत घट्ट असते. यामुळे हृदयाला रक्त शुद्ध करण्यासाठी अधिक मेहनत करावी लागते. याच कारणामुळे सकाळच्या वेळी हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता वाढते.सकाळी ठराविक वेळी, शांतपणे आणि गोंधळून न जाता झोपेतून उठले पाहिजे. तसेच ज्यांना वारंवार स्नूझवर ठेवण्याची सवय असते, त्यांनी असे करू नये. निरोगी हृदयासाठी दररोज सकाळी व्यायाम करण्याची सवय लावावी. जे लोक बिटा-ब्लॉकर घेतात, त्यांनी झोपण्यापूर्वी याचे सेवन करावे, जेणेकरून सकाळच्या वेळी हृदयरोगांपासून बचाव करता येईल. अनेकजण अचानक भरपूर व्यायाम करतात. मात्र, त्यांच्या शरीराला अशा मेहनतीची सवय नसते. अशा स्थितीत शरीरात स्ट्रेस हार्मोनची सक्रियता वाढते. यामुळे रक्तदाब आणि हृदयाचा वेग तीव्र किंवा अनियमित होऊन हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते. निरोगी हृदयासाठी व्यायाम आवश्यक असला तरी शरीराला पेलवणाराच व्यायाम करावा.