आरोग्यनामा ऑनलाइन टीम – कामाचा ताण, धावपळ, वाहतूक कोंडी, विविध अडचणी यामुळे अनेकदा मूड बिघडून जातो.अशावेळी चिडचिड होते. मनस्थिती खराब होते. मात्र, असेही काही खाद्यपदार्थ आहेत, जे तुम्हाला दिवसभर आनंदी ठेवू शकतात. अशा खाद्यपदार्थांचे सेवन केल्यास मन:स्थितील चांगली रहाते. शिवाय हे पदार्थ शरीराला कायमस्वरूपी फायदा देतात. मूड चांगला ठेवणारे हे पदार्थ कोणते आणि त्यांचा फायद काय होतो, याची माहिती असेल तर दिवस चांगला जाईलच, शिवाय शरीरही निरोगी राहण्यास मदत होईल.पालकच्या भाजीत भरपूर लोह असल्यामुळे भरपूर ऊर्जा मिळते. पालकाच्या सेवनाने थकवा दूर होतो आणि लक्ष केंद्रित होण्यास मदत होते. यामध्ये मेंदूची क्रियाशीलता वाढवणारे जीवनसत्त्व ब ६ व फोलेटही असते.
तसेच दिवसभर आनंदी राहण्यासाठी गोड पदार्थ खाणे कमी करावे. बिस्किटे, केक, चॉकलेट आणि शीतपेयांचे सेवन कमीत कमी करावे. त्याचबरोबर फळांचा रसही मर्यादेतच घ्यावा. तसेच व्हाइट कार्बपासून दूर राहावे. उदाहरणार्थ मैद्यापासून तयार झालेले ब्रेड, पास्ता आणि ब्राऊन राइस यापासून दूर राहावे आणि वारंवार भूक लागणार नाही याची काळजी घ्यावी. शरीर तंदूरूस्त राहण्यासाठी आणि मन सतत आनंदी राहण्यासाठी लीन प्रथिने घ्यावीत. मेवा, चिकन आणि मासे दीर्घ काळ ऊर्जा देण्याचे काम करतात. त्याचबरोबर वारंवार भूकही लागत नाही. तज्ज्ञ सांगतात की, फक्त ४५ मिनिटांचा व्यायाम केल्याने मन:स्थिती चांगली ठेवणाऱ्या अॅण्डोर्फिन हार्मोनचा स्राव चांगल्या प्रमाणात होतो.
यामुळे नैराश्य दूर होऊन सकारात्मकता वाढते. यासाठी निमित किमान पंधरा मिनिटे व्यायाम केला पाहिजे. रताळे हे कंदमूळ असून शक्यतो उपवासासाठी खाल्ले जाते. यामध्ये फोलेट आढळून येते. या फोलेटमुळे साखरेचे प्रमाण पुरेसे ठेवण्यास मदत होते. तसेच शेंगदाण्यामध्ये मन:स्थिती चांगली ठेवण्यासाठी कामी येणारे सेलेनियम हे खनिजद्रव्य मोठ्या प्रमाणात आढळून येते. चिंता कमी करण्यास शेंगदाणे मदत करतात. अंडी पौष्टिक आहेत. यामध्ये भरपूर असलेले झिंक चयापचय आणि मधुमेहाला नियंत्रित करते. यामुळे ऊर्जा प्राप्त झाल्याचा आभास होतो. तसेच दह्यामध्ये कॅल्शियम आणि प्रथिने मोठ्या प्रमाणावर असतात. त्यामुळे स्वभावात येणाऱ्या चढ-उताराचे परिणाम कमी होतात. शिवाय नैराश्य आणि चिंताही दह्याच्या सेवनाने दूर होते. यासाठी वरील पदार्थांचा आहारात समावेश केल्यास आपला दिवस आनंदात जाईल, आणि आरोग्यही प्राप्त होईल.