आरोग्यनामा ऑनलाईन – अन्नसुरक्षा व मानके कायद्यानुसार अन्नपद्धार्थ आणि शीतपेयांची विक्री करणाऱ्या सर्वच विक्रेत्यांना एफडीएकडे नोंद करणे बंधनकारक आहे. परंतु अनेक जण नोंदणी करीत नाहीत. परवाना असलेले बर्फाचे छोटेमोठे कारखाने आहेत. परंतु हा बर्फ नागरिकांच्या शरीराला हानिकारक असूनही याकडे कोणाचेच लक्ष नाही. अनेक शीतपेयविक्रेते व्यवसायासाठी वापरला जाणारा बर्फ खरेदी करून त्याचा वापर व विक्री करीत आहेत. हा बर्फ मानवी शरीरास तेवढाच घातक आहे. त्यामुळे असा बर्फ सेवन केल्यास नागरिकांना विविध व्याधींना सामोरे जावे लागते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. विशेष म्हणजे आजपर्यंत अशा पदार्थांची तपासणी झाल्याचे ऐकिवात नाही.
उन्हाळ्यात शरीरातील तापमानाचा समतोल राखण्यासाठी नागरिक थंडपेयांना प्राधान्य देतात. डॉक्टरसुद्धा थंडपेये पिण्याच्या सल्ला देतात. त्यामुळे फ्रुट जूस, सरबत, ताक, लस्सी, निरा, बर्फाचा गोळा, उसाचा रस, आइस्क्रीम आदी पदार्थांची दुकाने हाउसफुल आहेत. मात्र ही शीतपेय आरोग्यास हितकारक आहेत की नाहीत, याची तपासणी करण्याची तसेच त्यांच्या विक्रीला परवानगी देण्याची जबाबदारी एफडीएवर आहे. अन्यथा मानवाचे आरोग्य धोक्यात येण्याची दाट शक्यता आहे.
उन्हाळ्याच्या दिवसांत थंडावा देणारी फळे सेवन केल्यास कोणतीही इजा शरीरास होत नाही. याउलट शरीरास उपयुक्त असलेले प्रोटीन या फळांतून मिळत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी विविध रंगांचा वापर करून शीतपयेयांची विक्री केली जाते. प्रत्यक्षात नैसर्गिक रंगांचे किंवा आयएसआय मार्क असलेले रंगच वापरणेआवश्यक आहे. चवीसाठी वापरले जाणारे पदार्थ प्रमाणित आणि योग्य प्रमाणात असायला हवेत. मात्र नियम धाब्यावर बसवून आरोग्यासाठी घातक असलेल्या पदार्थांची विक्री काही ठिकाणी सुरू आहे. यावर अन्नसुरक्षा विभागाने आळा घालणे गरजेचे आहे.