आरोग्यनामा ऑनलाईन टीम – उपचार खर्चाची वैद्यकीय बिलं मिळवण्यासाठी होणाऱ्या मनस्तापातून राज्यभरातील अनेक शिक्षकांची आता सुटका होणार आहे. कारण राज्यातील सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ‘कॅशलेस आरोग्य योजना’ सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकार घेणार आहे. गेल्या अनेक वर्षापासून ही मागणी करण्यात येत होती.
राज्यातील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना औषधोपचाराचा खर्च परताव्याने मिळत असतो. मात्र तो मिळविताना त्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. मात्र शिक्षकांची वैद्यकीय बिलं वेळेवर मंजूर होत नाहीत, असं निदर्शनास आलं आहे. आमदार सुनील शिंदे यांनी याविषयी प्रश्न विधानसभेत उपस्थित केला होता. त्यावर ही मागणी लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन शिक्षणमंत्री आशिष शेलार दिले असून लवकरच या प्रस्तावाबाबत निर्णय घेतला जाईल.
कॅशलेश योजना लागू झाल्यास त्याचा हजारो शिक्षकांना लाभ होणार आहे.शिक्षकांसाठी आरोग्य विमा योजना सुरू करण्याबाबत तत्कालीन शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे प्रस्ताव दिला होता. मात्र त्यावर पुढे कोणतीही अंमलबजावणी झाली नाही.