आरोग्यनामा ऑनलाईन टीम – एकत्र कुटुंबपद्धती लोप पावत चालल्यामुळे जीवनशैलीत मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. पूर्वीच्या लोकांचे भावनाबंध एकमेकांशी जुळलेले असायचे. त्यामुळे लोक एकमेकांसोबत वेळ घालवण्यास प्राधान्य देत होते. कुटुंबातील सर्वजण सोबत आणि जमिनीवर बसून जेवण करायचे. यामुळे नातेसंबंध तर दृढ व्हायचेच पण आरोग्यही चांगले राहायचे. मात्र आता जमिनीवर जेवण्याऐवजी डायनिंग टेबलवर बसून जेवण्याची पद्धत रुढ झाली आहे. वेळेच्या कमतरतेमुळे लोक अनेकदा मेट्रोमध्ये ,बसमध्ये जेवण करतात. तर काही लोक टीव्हीसमोर बसून किंवा पलंगावर किंवा डायनिंग टेबलवर बसून जेवण करणे पसंत करतात. या सवयी आरामदायक वाटत असल्या तरीही आरोग्यासाठी मात्र हानिकारक आहेत. मात्र याविषयी आपल्याला माहिती नसते. जमिनीवर जेवण करण्याचे फायदे जाणून घेऊयात –
अन्नपचन सुरळीत होते –
डायनिंग टेबलवर बसून जेवल्यामुळे पोटाशी संबंधित अनेक आजार होण्याची शक्यता असते. मात्र आपण जेव्हा जमिनीवर मांडी घालून आपण जेवायला बसतो, तेव्हा आपण एका विशिष्ट योगासन घालून बसलेलो असतो. त्यामुळे पचन व्यवस्थित होण्यास मदत होत. शरीरावर कुठल्याही प्रकराचा अतिरिक्त भार नसतो. अन्न पचनात बाधा येत नाही. शरीर ताठ राहातं आणि त्यामुळे अन्न नलिकेतून जेवण योग्य पद्धतीने पोटात जातं. जेव्हा जमिनीवर बसून जेवण केले जाते तेव्हा तुम्ही खाण्यासाठी थोडेसे पुढे वाकता आणि अन्न गिळण्यासाठी पुन्हा पूर्वस्थितीमध्ये येतात. अशाप्रकारे वारंवार पुढे आणि मागे वाकल्यामुळे तुमच्या पोटातील मांसपेशी सक्रिय होऊन पोटातील अॅसिड वाढते. यामुळे अन्न पचवणे सोपे जाते.
वजनावर आणि खाण्यावर नियंत्रण राहते –
जमिनीवर बसून जेवन केल्यानंतर पोट सुटत नाही. शिवाय अपचन, जळजळ, पोटासंबधीत विकार होत नाहीत. मांडी घालून बसल्यामुळे तुमचा मेंदू शांत होतो आणि तुम्ही तुमच्या जेवणावर व्यवस्थितपणे लक्ष केंद्रित करू शकता. तसेच खाण्याची गती संथ होते. यामुळे तुम्ही गरजेपेक्षा जास्त जेवण करण्यापासून दूर राहू शकता.
रक्तप्रवाह सुधारतो –
डायनिंग टेबलवर बसण्याऐवजी जमिनीवर बसल्यास शरीरात होणारा रक्तप्रवाह सुधारतो. शरीराची लवचिकता वाढते.मांडी घालून बसल्याने शरीराच्या नसांचा थकवा कमी होतो. आपण जेव्हा जमिनीवर बसून जेवत असतो तेव्हा पाठीचा कणा ताठ राहतो. तसेच पोट, पाठ, खाद्यांची सतत हालचाल होत राहते.
गुडघेदुखीचा त्रास कमी –
गुडघे दुखीची समस्या दूर होते जमिनीवर बसून खाल्ल्याने गुडघे आणि घोटे लवचिक होतात. या लवचिकपणामुळे पुढे चालून उठण्या-बसण्यासाठी त्रास होत नाही.