आरोग्यनामा ऑनलाइन टीम – पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्त्व आणि खनिज असतात. महागड्या टॉनिक्सपेक्षा अनेकपटींनी जास्त जीवनसत्त्वे पालेभाज्यांतून शरीराला मिळतात. नियमित एक वाटी शिजवलेल्या पालेभाजीचा आहारात समावेश केल्यास आरोग्य एकदम फिट राहू शकते. पालेभाज्यांमध्ये अ आणि क जीवनसत्त्वे, कॅल्शियम, लोह, फायबर याचे प्रमाण खूप असते. शिवाय त्या पचायला हलक्या असतात. यासाठी महिलांनी रोज ऑफिसवरून येताना एकतरी पालेभाजीची जुडी स्वतासाठी आणून तीचे सेवन करावे, हा उपाय केल्यास त्यांना आरोग्याच्या तक्रारींना सामोरे जावे लागणार नाही. हिरव्या पालेभाज्यांमध्ये क्लोरोफिल हा घटक मोठय़ा प्रमाणात असल्याने तो शरीरातील घातक विषाणूंवर हल्ला चढवून त्यांना नष्ट करतो. पालेभाज्यांमधील विविध जीवनसत्त्वे शरीरासाठी उपयुक्त असतात. म्हणून पालेभाज्या नियमित खाल्ल्या पाहिजे. महिलांनी पालेभाज्या नियमित खाल्ल्या तर त्या सदैव फिट राहू शकतात.
पालेभाजी म्हटले की आपण फक्त पालक, चुका, मेथी, अळू, शेपू, कोथिंबीर याच भाज्या खातो. पण, प्रत्येक्षात शेकडो पालेभाज्या आहेत. यासाठी पालेभाज्यांची माहिती करून घेऊन ज्या-ज्या खूप महत्वाच्या व शरीराल आवश्यक पालेभाज्या आहेत त्यांचे सेवन केले पाहिजे. भाज्यांत औषधी गुणधर्मही भरपूर असतात. कडधान्ये, डाळी आणि शेंगदाणे घालून, दही लावून, चिंच, गूळ घालून, लसूण, मिरची, हिंगाची फोडणी घालून अशा अनेक प्रकारे पालेभाज्या करतात येतात. अनेक पालेभाज्या तर केवळ निवडायचा त्रास किंवा आवडत नाहीत म्हणून खाल्ल्या जात नाहीत. असे करून चालणार नाही. पालेभाज्या करताना त्यात नेहमी डाळीचे पीठ, सोयापीठ, पनीर, दही घालावे किंवा बरोबर लिंबू खावे. पालेभाज्यातून मिळणारे बीटा कॅरोटिन महत्त्वाचे अँटिऑक्सिडंट आहे. जे कॅन्सरसारख्या आजारांना दूर ठेवते. हृदयरोगासाठीही ते उपयुक्त आहे.
पालेभाज्यांमधला चोथाही अत्यंत उपयुक्त असतो. पालेभाज्यांत उष्मांक कमी आणि चोथा अधिक असतो. हा चोथा बद्धकोष्ठता कमी करतो. वजन कमी करण्यासाठी पालेभाज्या वरदानच आहेत. मधुमेहींमध्ये रक्तातील साखरेची पातळी कमी करतो आणि नियंत्रित ठेवतो, वाढलेले कोलेस्टेरॉलचे प्रमाण कमी करतो. पालेभाज्यांमध्ये सोडियम आणि पोटॅशियम भरपूर असल्याने ज्यांना किडनी विकार असतील त्यांनी आहारतज्ज्ञांकडून प्रमाण आणि त्या घेण्याची पद्धत समजावून घ्यावी. पालेभाज्या गरम पाण्यात मीठ आणि हळद घालून थोडा वेळ ठेवाव्यात आणि नंतर वापराव्यात. पालेभाज्या केल्यानंतर लगेचच खाव्यात, पुन्हा पुन्हा गरम केल्यास त्यामधील जीवनसत्त्वांचा ऱ्हास होतो.