आरोग्यनामा ऑनलाइन टीम – मुंबईतील आझाद मैदानात हे आंदोलन छेडण्यात येणार आहे. अनेक वर्षांपासून बदली कामगार म्हणून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जागी खासगी पद्धतीने कर्मचारी नेमण्याच्या विरोधात राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना समन्वय समिती १८ जूनला राज्यव्यापी धरणे आंदोलन करणार आहे.वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालयाच्या अंतर्गत राज्यातल्या २७ सरकारी रुग्णालयांमधील चतुर्थ श्रेणी सेवांचे खासगीकरण करण्याचा डाव राज्य सरकारचा आहे, असा आरोप राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना समन्वय समितीने केला आहे.
सरकारच्या या निर्णयामुळे बदली कर्मचाऱ्यांच्या ठिकाणी खासगी कर्मचारी काम करतील. त्यामुळे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर गदा येणार आहे. यामुळे खासगीकरणाचे धोरण आणू नये अशी त्यांची मागणी आहे.कर्मचाऱ्यांच्या या प्रश्नांकडे आणि प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी १८ जूनला चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांनी राज्यव्यापी धरणे आंदोलन करणार आहेत. या आंदोलनाबाबत राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना समन्वय समितीचे अध्यक्ष देविदास बढे म्हणाले, डॉक्टर आणि परिचारिकांसह चतुर्थ श्रेणीतील कर्मचारी रुग्णसेवा करतात. पण कित्येक वर्षात या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यात आलेली नाही. उलट चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची रिक्त पदे सरकार कंत्राटी पद्धतीने भरत आहे.
ही पदे सरकारी सेवा शर्ती नियमांनुसार भरावीत चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे खासगीकरण करू नये, बदली कामगार आणि वारसा हक्कांना सरकारी सेवेत समाविष्ट करून घ्यावे, अशा विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मुंबईत एकदिवसीय राज्यव्यापी धरणे आंदोलन केले जाणार आहे. सरकारी रुग्णालयांत सफाई कामगार, नाईक, लॉंड्री कर्मचारी अशा वेगवेगळ्या खात्यातील चतुर्थ श्रेणी सेवांचे खासगीकरण करण्याचे काम सुरू आहे. चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या सेवा खासगी कंत्राटदारांच्या ताब्यात देण्यासाठी सरकारने विविध वृत्तपत्रांमध्ये ई-निविदांद्वारे जाहिरीती प्रसिद्ध केल्या आहेत. सरकारने चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांची २५ टक्के पदे कपात केली आहे. ही पदे पुन्हा पुनर्जीवित करावी, अशी आमची मागणी आहे. या आंदोलनानंतरही सरकारने मागण्या विचारात न घेतल्यास येत्या पावसाळी अधिवेशनात विधानभवनात महामोर्चा काढू, असा इशारा या संघटनेने दिला आहे.