पुणे : आरोग्यनामा ऑनलाइन – आहार नियंत्रित ठेवल्यास उत्तम स्वास्थ्य राहते असे मत प्रसिद्ध आहारतज्ञ डॉ. जगन्नाथ दीक्षित यांनी व्यक्त केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, अंबाजोगाई, नारायणदादा काळदाते स्मृति प्रतिष्ठान व क्षीतिज प्रतिष्ठान यांच्या वतीने ‘विनासायास वेटलॉस व मधुमेह प्रतिबंध’ या विषयावर डॉ. दीक्षित यांचे व्याख्यान झाले. सेवानिवृत्त वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ. प्रवीण शिनगारे यांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार पार पडला.
डी. बी. ठोंबरे, आ. विक्रम काळे, नंदकिशोर मुंदडा, राजकिशोर मोदी, माजी आ. पृथ्वीराज साठे, दत्तात्रय पाटील, डॉ. सुधीर देशमुख, अंकुशराव काळदाते,अनिकेत लोहिया, दगडू लोमटे, डॉ. संदीप थोरात , अभिजित जोंधळे, प्रतिष्ठानचे जी. जी. रांदड, डॉ. नरेंद्र काळे यांची उपस्थिती होती. यावेळी डॉ. दीक्षित म्हणाले, कमी खाणे, नियमित व्यायाम हीच खरी जीवनशैली आहे. या जीवनशैलीतून जीवन जगण्याची नवी उमेद निर्माण होते. आवश्यकतेपेक्षा जास्त खाण्यामुळे वजन वाढते. यासाठी शरीराबाबत जागरूकता बाळगण्याचे आवाहन त्यांनी केले. इतर मान्यवरांचीही भाषणे झाली. प्रास्ताविक डॉ. नरेंद्र काळे यांनी केले. संचलन ज्योती शिंदे यांनी तर पाहुण्यांचा परिचय डॉ. संदीप थोरात यांनी करून दिला. आभार अभिजित जोंधळे यांनी मानले. या कार्यक्रमास नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते..