आरोग्यनामा ऑनलाईन टीम – अनेकजणांना अचानक उचकी लागते. उचकी आल्यानंतर आपण पाणी पितो. पण प्रत्येक वेळेस पाणी पिणे हाच उचकीवरील उपाय नसू शकतो कारण उचकी येण्याची अनेक कारणे असतात. सतत उचकी येणे हा एक प्रकारचा आजारच आहे. तसं उचकी येणे सामान्य गोष्ट आहे. ती कधीही येऊ शकते. उचकी लागल्यावर ती थांबेपर्यंत अस्वस्थ व्हायला होतं. वर नमूद केल्याप्रमाणे कधीकधी नुसत्या पाण्याने उचकी रोखणे खूप अवघड होऊ जाते. जाणून घ्या उचकी थांबवण्याचे आणखी काही उपाय.
१) उचकी आल्यावर लगेच एक चमचा साखर खावी. साखर खाल्यामुळे थोड्यावेळात उचकी थांबते. त्याशिवाय साखर आणि थोडं मीठ पाण्यात टाकून ते थोड्या थोड्या वेळाने प्यायल्यास उचकी थोड्यावेळात बंद होते.
२) उचकी लागल्यावर एक लांब श्वास घ्यावा. आणि काही सेकंद रोखून ठेवावा. असे केल्याने फुफ्फुसात हवा भरुन राहते आणि उचकी आपोआप थांबते.
३) एक चमचा मीठ तोंडात ठेवावे. इतक्या मोठ्या प्रमाणात मीठाची चव घेतल्यास उचकी थांबते. हे शक्य नसल्यास थोडे मीठाचे पाणी घोट घोट करुन प्यावे. असे केल्यास उचकी त्वरीत बंद होते.
४) अनेकवेळा वेगाने जेवताना उचकी लागते. त्यामुळे मध्येच पाणी प्यावे लागते. आणि पूर्ण जेवण होण्याआधीच पोट भरते. म्हणूनच जेवताना हळूहळू आणि सावकाश एक एक घास चावत जेवावे. घाईघाईत जेवल्याने तसेच जेवणात अचानक तिखट पदार्थ आल्यास उचकी लागू शकते.