आरोग्यनामा ऑनलाईन टीम – धावपळीच्या जीवनात आपल्याला सर्वच गोष्टी लवकरात लवकर पाहिजे असतात. फळे लवकरात लवकर पिकावीत यासाठी रसायनांचा वापर सर्रासपणे होताना दिसून येतो. रसायनांचा वापर करून पिकवलेली फळे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात. सध्या बाजारात येणारे बरेचसे आंबे हे रसायनाचा वापर करून पिकविण्यात येतात.
रसायनांचा वापर करून फळे पिकविणे बेकायदेशीर
फळे पिकविण्यासाठी प्रामुख्याने कार्बाइड या रसायनाचा वापर होतो. फळे पिकींविण्यासाठी कार्बाइडचा वापर करणे हे खाद्य सुरक्षा व मानक अधिनियम २०११ च्या कायद्यानुसार गुन्हा आहे. कार्बाईड्ची साठवण विक्री आयात करणाऱ्यांसाठी कायद्यात शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. कायद्यानुसार कोणत्याही फळाला रसायन वापरून पिकविता येऊ शकत नाही. कार्बाइडचा वापर करून पिकवलेली फळे शरीरासाठी हानीकारक ठरतात. कोणी फळविक्रेता रसायन वापरून पिकवलेली फळे विकत असेल तर त्याची तक्रार अन्न आणि औषध विभागाकडे करता येते.
का आहे कार्बाइड हानिकारक ?
भारतीय खाद्य सुरक्षा व मानक प्राधिकरण नुसार, कॅल्शिअम कार्बाईडमध्ये आर्सेनिक आणि फॉस्फरस हे दोन वायू असतात. हे वायू पाण्याच्या संपर्कात आल्यास ऍसिटिलीन गॅसची निर्मती होते. यांच्यामुळे कँसर होऊ शकतो. डोकेदुखी, चक्कर येणे, अचानक झोप येणे, स्मरणशक्ती कमी होणे असे विकार या कार्बाइडमुळे होऊ शकतात.
काय खबरदारी घ्यावी ?
जी फळे कार्बाइडचा वापर करून पिकविलेली असतात ती फळे दोन ते तीन दिवसात काळी पडतात.
कार्बाइडचा वापर करून पिकवलेली फळे हि आतून गोड तर बाहेरून कच्ची लागतात.
डाग नसलेली फळे खरेदी करावीत.
कृत्रिमरीत्या पिकवलेल्या फळांमध्ये डाग आणि अनैसर्गिक रंग दिसून येतो.
फळे खाण्याच्या अगोदर ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावीत.
विश्वासू किंवा ओळखीच्या दुकानदारांकडून फळांची खरेदी करावी.