आरोग्यानामा ऑनलाइन टीम – निरोगी राहण्यासाठी प्रथम काही व्यसनांपासून दूर राहणे अत्यंत गरजेचे आहे. तसेच जीवनशैली आणि खाण्यापिण्यावर लक्ष देण्याचीही गरज आहे. निरोगी जीवनासाठी स्वत:वर काही बंधने घालून घेणे, आवश्यक आहे. त्याशिवाय निरोगी जीवन जगता येणार नाही. काही सवयी अशा असतात, ज्यामुळे तुमचे आरोग्य सतत बिघडत असते. तरीसुद्धा या सवयींकडे कानाडोळा केला जातो. कारण या सवयींचे व्यसन लागलेले असते.
अतिमांसाहार करणारांना कर्करोग, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा व हृदयविकार असे गंभीर आजार होऊ शकतात. तसेच जास्त अंडी खाल्ल्यामुळेही शरीरात कोलेस्टेरॉलचे प्रमाणही वाढते. शिवाय साखर हे सुद्धा आरोग्यासाठी गोड विष आहे. साखर बनवताना ज्या रसायनांचा वापर केला जातो, ते साखरेतील पोषक घटक नष्ट करतात. त्यानंतर साखरेत केवळ कॅलरीच उरते. साखरेऐवजी गूळ खाण्याचा प्रयत्न करा. गुळात जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, यामुळे शरीर निरोगी राहते.
निरोगी राहण्यासाठी प्रथम मद्यपान बंद करणे गरजेचे आहे. या व्यसनामुळे हृदयविकारांसह मधुमेह आणि रक्तदाबाची शक्यता वाढते. तसेच भेसळयुक्त रंगापासून बनवलेली मिठाई आरोग्यासाठी घातक असते. त्यामुळे कर्करोग व त्वचेचे विकार होण्याचा धोका असतो. अशी मिठाई खाणे टाळले पाहिजे. शिवाय चहा व कॉफीत असलेल्या टॅनिन व कॅफिनमुळे तुम्हाला निद्रानाशासह यकृताची समस्या, मलावरोध, गॅस व अल्सरसारख्या अनेक व्याधी होऊ शकतात. म्हणून चहा-कॉफीऐवजी तुम्ही लिंबूपाणी प्यावे. डबाबंद खाद्यपदार्थांकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करावा. हे पदार्थ टिकवण्यासाठी त्यात ट्रान्सफॅट्सचा वापरले जाते. ते आरोग्यासाठी खूप घातक असते. तसेच आहारात तंतुमय पदार्थांचा समावेश करावा. आहारात तंतुमय पदार्थांचा समावेश कमी असेल तर लठ्ठपणा, मलावरोध व मधुमेहासारख्या समस्या उद्भवतात.