आरोग्यनामा ऑनलाइन टीम – दूषित पाणी पिणे, अयोग्य आहार, मलावरोध, तणाव, वातावरणातील दूषित घटक श्वासाच्या माध्यमातून शरीरात पोहोचणे आणि चहा, कॉफी किंवा अल्कोहोलचे अधिक सेवन करणे यामुळे शरीरात विषारी घटकांची पातळी वाढू लागते. अशावेळी शरीराचे डिटॉक्सिफिकेशन म्हणजेच शरीरातील विष बाहेर टाकणे आवश्यक असते. विविध प्रकारचा संसर्ग होणे, प्रतिकारशक्ती कमी होणे, डोकेदुखी, लवकर थकवा येणे, पचनाशी संबंधित समस्या उद्भवणे आणि त्वचेशी संबंधित विकार होणे यासारखी लक्षणे रक्त अशुद्ध असल्याचे संकेत देतात.
मूत्रपिंड आणि यकृत विषारी पदार्थ पूर्णपणे बाहेर काढण्यास असमर्थ ठरल्यास वरील लक्षणे दिसून येतात. विषारी घटकांची पातळी वाढल्याने शरीर यंत्रणा व्यवस्थित काम करत नाही. अशा स्थितीत रक्त शुद्धीकरण आणि अवयवांची कार्यप्रणाली चांगल्या पद्धतीने कायम राखण्यासाठी डिटॉक्सिफिकेशन गरजेचे असते. डिटॉक्स प्लॅन शरीर शुद्धीकरणाची नैसर्गिक पद्धत आहे. पाण्याशिवायही अनेक पदार्थ शरीराचे डिटॉक्सिफिकेशन करतात.
ग्रीन टीशिवाय डिटॉक्स प्लॅन अपूर्ण आहे. विषारी घटक शरीराबाहेर काढणे आणि यकृताची कार्यप्रणाली चांगली ठेवण्यासाठी ग्रीन टी आवश्यक आहे. सर्व प्रकारच्या फळांपासून तयार केलेल्या सॅलडने दिवसाची सुरुवात करावी. ताज्या फळांमध्ये भरपूर जीवनसत्त्वे, खनिजे, फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात. त्यामुळे पचनक्रिया सुधारते. भरपूर क जीवनसत्त्व असलेल्या लिंबामुळे त्वचा तजेलदार राहते. आंबट फळांमध्ये आढळून येणारा अल्कलीन शरीराची पीएच पातळी संतुलित ठेवतो.
यामुळे प्रतिकारशक्तीही बळकट बनते. तसेच अधिक मेदयुक्त पदार्थ किंवा अल्कोहोलचे सेवन केल्यास पचनक्रिया बिघडते. अशावेळी अद्रकाचे सेवन केल्यास फायदा होतो. त्यामुळे मलावरोधाचा त्रास कमी होतो आणि पचनक्रियाही सुधारते. एखाद्या अँटीबायोटिकप्रमाणे लसूण उपयोगी ठरतो. लसणातील अॅलिसिन घटक पांढऱ्या रक्तपेशींची निर्मिती करतो. यामुळे विषारी घटकांपासूनही संरक्षण होते.