आरोग्यनामा ऑनलाइन टीम : जीवनात श्वासाला खूप महत्त्व आहे. श्वास या शब्दाचा वापर एखाद्याचा मृत्यू झाला तर त्याने अंतिम श्वास घेतला असा केला जातो. श्वास घेताना मनुष्य प्राणवायू घेतो, त्याला विष्णुपदामृतही म्हणतात. प्रत्येकाच्या जीवनात श्वास आणि उच्छवास यास अतिशय महत्त्व आहे. योगामध्ये श्वासाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.म्हणूनच योगासने केल्यास दीर्घायुष प्राप्त करता येते. श्वास घेणे म्हणजे पूरक, सोडणे म्हणजे रेचक आणि रोखून ठेवणे म्हणजे कुंभक,असे म्हटले जाते.
प्रत्येकाला श्वास हे मोजूनच मिळालेले असतात. दीर्घायुष्य प्राप्त करायचे असेल तर श्वासावर नियंत्रण मिळवता आले पाहिजे, असे योगविद्येत सांगितले आहे. संशोधकांनी अधिक वर्षे जीवन जगणा-या प्राण्यांचा अभ्यास केला असता असे आढळून आले की, हळूवार श्वास घेणारे प्राणी अधिक वर्षे जगतात. कासव सात मिनिटातून एक श्वास घेतो आणि तो ३०० हून अधिक वर्षे जगतो. त्याउलट कुत्र्याचे आहे. कुत्रा खूप वेगाने श्वास घेतो आणि अवघी तेरा ते चौदा वर्षे जगतो.
यावरून समजते की श्वास किती मौल्यवान आहे. श्वास किती आणि केव्हा घ्यावा यावर बरेच काही आवलंबून असते. नियमित योगाभ्यास आणि प्राणायामामुळे श्वासाची गती हळू हळू कमी होऊ लागते.आपण दीर्घ श्वास घ्यायला शिकतो. प्राचीन ऋषी मुनी म्हणूनच अधिक वर्षे जीवन जगत होते. यासाठी दीर्घ श्वास घेणे खूप महत्वाचे आहे. योगाभ्यासाने ते अवगत होते. नियमित योगासने, प्राणायाम केल्यास दीर्घआयुष्य लाभू शकते.