एक व्यक्ती एक पिझ्झा खातो. मीठ घातक असून याचे किती सेवन केले पाहिजे, हे बहुतांश लोकांना माहीत आहे. जास्त मीठ हृदयासाठी चांगले नसते. शरीरात रक्ताभिसरण व्यवस्थित न होण्यामागची कारणे लठ्ठपणा आणि वर्कआउट न करणे हे आहे. परंतु एका शोधानुसार जेवणात मिठाचा जास्त प्रमाणात वापर केल्यामुळे सुद्धा हा त्रास वाढतो. यामुळे ब्लडप्रेशर वाढणे, हार्टअटॅक अशा गंभीर समस्यांना सामोरे जावे लागते.
हार्टअटॅकमुळे येऊ शकतो मृत्यू
ब्लडप्रेशरचा त्रास असेल तर जेवणातील मिठाचा वापर कमी करावा. वय वाढत जाते तसे जेवणातील मिठाचे प्रमाण कमी करावे. ब्लडप्रेशरची समस्या कोणत्याही वयात उद्भवू शकते. अनेक जण जंकफूड आणि रेडी टू इट फूड खातात. या पदार्थांमध्ये मिठाचे प्रमाण जास्त असते. अशाप्रकारच्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे हृदयविकाराची भिती वाढते. जगभरात लाखो लोकांना हृदयरोग आणि हार्टअटॅकमुळे अकाली मृत्यूला सामोरे जावे लागते. डब्ल्यूएचओने प्रमाणित केलेल्या पद्धतीने मिठाचे सेवन केल्यास जगभरात प्रत्येक वर्षी होणारे २५ लाख अकाली मृत्यू टाळता येऊ शकतात.
ही काळजी घ्या
* मीठ कमी खा. जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्यास हायपर टेन्शन आणि हाय ब्लडप्रेशर आजारांना सामोरे जावे लागते. सतत हायपर टेन्शन राहिल्यास हृदयाचे आणि किडनीचे आजार होण्याची शक्यता वाढते.
* जास्त मीठ खाल्ल्यास रक्तात आयर्नचे प्रमाण कमी होते आणि अॅसिडिटी वाढते. यामुळे भूक लागली नसली तरी भूक लागल्यासारखे वाटते. या कारणामुळे जास्त कॅलरी शरीरात जातात आणि लठ्ठपणाला सामोरे जावे लागते.
* मिठामध्ये असलेले सोडियम जास्त प्रमाणात शरीरात गेल्यास पोटाचा कॅन्सर होण्याची शक्यता वाढते. आरोग्य ठणठणीत ठेवण्यासाठी मिठाचे कमी प्रमाणात सेवन करावे.
* जेवणात मिठाचे जास्त प्रमाण असल्यास गुडघ्यावर सूज आणि लठ्ठपणाची समस्या वाढते. यामुळे हाडे ठिसूळ होतात आणि ओस्टियोपोरोसिस होण्याचा धोका वाढतो.
* जेवणात मिठाचे प्रमाण कमी करावे तसेच तळलेले आणि डबाबंद पदार्थांचे सेवनही कमी करावे.