आरोग्यनामा ऑनलाइन – मेट्रो-३ च्या कामांमुळे मंत्रालय, विधान भवन परिसरात मच्छरांची उत्पत्ती होत आहे. त्यामुळे या भागातील १२ जणांना मलेरिया, डेंग्यू झाला आहे. या परिस्थितीत खोदकामामुळे निर्माण होणारे पाणी साचू देऊ नका, असे पत्र मुंबई पालिकेने एमएमआरडीएला पाठवले आहे.
सध्या मंत्रालय, विधान भवन परिसरात मेट्रो-३ चे काम जोरात सुरू आहे. या कामादरम्यान करण्यात येणाऱ्या खोदकामामुळे पडणाऱ्या खड्ड्यांमध्ये पाणी साचते. याकडे दुर्लक्ष झाल्याने परिसरात डासांची उत्पत्ती होण्यास मदत झाली आहे. परिसरात डास पसरल्याने मंत्रालयातील कर्मचारी हैराण झाले आहेत. मंत्रालय परिसरातील १२ जणांना मलेरिया, डेंग्यूची लागण झाली आहे. मेट्रोचे काम करणाऱ्या काही कामगारांनाही मलेरियाची लागण झाली आहे.
परिणामी, त्यांना सुट्टीवर पाठवण्यात आले आहे. येत्या काही दिवसांनंतर पावसाळी अधिवेशन आहे. त्यामुळे येथे ये-जा करणाऱ्यांची गर्दी वाढणार आहे. त्यामुळे येथे झपाट्याने पसरणाऱ्या डासांमुळे साथीचे आजार पसरण्याची भीती निर्माण झाली आहे. पालिकेच्या संबंधित विभागाने याची दखल घेतली असून, येथे खोदकामामुळे साचणाऱ्या पाण्याकडे मेट्रोने लक्ष द्यावे, पाणी साचू देऊ नये, असे पत्र एमएमआरडीएला पाठवले आहे.