शलाका धर्माधिकारी :
आरोग्यनामा ऑनलाईन टीम – धनलक्ष्मीचा वास घरात आणि कार्यस्थळी राहावा म्हणून आपण अनेक प्रयत्न करतो. परंतु संपत्ती रुपी लक्ष्मीपेक्षाही सर्वात महत्वाची आहे ती आरोग्य लक्ष्मी म्हणजेच आपले ‘आरोग्य’ . म्हणूनच पुराणात निरोगी शरीराला देखील लक्ष्मीचा दर्जा देण्यात आला आहे . शरीर सुदृढ असेल तरच धन , धान्य , संतान लक्ष्मी मिळवता येते . म्हणूनच आरोग्य लक्ष्मीचा वास घरात राहावा यासाठी खालील उपाय घरात करावेत . हा प्रत्येक उपाय शास्त्राला बांधून असल्याने त्याचे परिणाम नक्कीच जाणवतील.
१. घरातील बाथरूम आणि टॉयलेट्स नेहमी स्वच्छ ठेवावेत . शरीरावरील आणि शरीराच्या आतील मैल्याची स्वच्छता जिथे रोज होते , तो घरातील सर्वात अस्वच्छ भाग नेहमी स्वच्छ ठेवावा.
२ .रात्री स्वयंपाकाच्या ओट्यावर खरकटे भांडे ठेऊ नका . खरकटे बाजूला करून भांडे एका जागी जमा करावेत . पावसाळ्यात चिलटे आणि माश्या ओट्या जवळ अर्थात जिथे अन्न पदार्थ शिजवले जातात तिथे अधिक घोंगावतात . त्यामुळे खरकटे राहणार नाही याची काळजी घ्या . स्वयंपाक सुरु करण्यापूर्वी चिलटे किंवा माश्या असतील तर आधी कापूर जाळा.
३. बाहेरून आल्यानंतर चपला उचलून रॅकमध्ये ठेवाच. चपला घरात आणू नका .
४. रोज एक दिवसाआड फरशी फिनेल किंवा खडीमिठ पाण्याने पुसावी. पाण्यात सुवासिक अत्तर टाकले तरीही उत्तम . मोहक वासाने मन प्रसन्न राहते . तसेच दर पंधरा दिवसांनी घरातील पायपुसणे बदला . स्वच्छ धुतलेले कोरडे पायपुसणे टाका.
५. घरात कचरा साठवून ठेऊ नका.
६.एकदा शिजवलेले अन्न सारखे गरम करून खाऊ नका. घरातील माणसांच्या अंदाजाने अन्न शिजवावे. १ पेक्षा जास्त वेळा गरम करून खाऊ नये.
७. पिण्याचे पाणी तोटी (नळ) असलेल्या भांड्यात साठवावे. हे भांडे पितळ , तांबे किंवा मातीचे असावे. प्लास्टिक मध्ये पिण्याचे पाणी साठवू नये.
८. रोज सकाळी आणि संध्याकाळी चांगल्या तुपाचा दिवा देवापुढे लावून कापूर जाऊन घरात फिरवा . मनाची सात्त्विकता निरोगी शरीरासाठी तेवढीच महत्वाची आहे .