आरोग्यनामा ऑनलाईन टीम – भारताच्या पहिल्या महिला डॉक्टर म्हणून आनंदीबाई जोशी सर्वांनाच परिचित आहेत. दुर्दैवाने त्या भारतात परतल्यानंतर डॉक्टरकीची प्रॅक्टिस करू शकल्या नाहीत. त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. डॉक्टरकीची पदवी मिळवून प्रत्यक्ष प्रॅक्टिस करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला डॉक्टर म्हणजे रखमाबाई राऊत. मात्र आनंदीबाई जोशी यांच्या तुलनेत रखमाबाईंना फारशी प्रसिद्धी मिळाली नाही.
सावत्र पित्याच्या प्रोत्सहानामुळे डॉक्टर –
रखमाबाईंना डॉक्टर बनवण्यात त्यांचे सावत्र पिता डॉ सखाराम राउत यांचा मोठा वाटा होता. त्यांचा जन्म २२ नोव्हेंबर १८६४ रोजी जयंतीबाई व जनार्दन सावे यांच्या पोटी झाला. मात्र अल्पावधीतच त्यांचे पितृछत्र हरपले. त्यांचे आजोबा हरिश्चंद्र चौधरी यांनी त्याच्या आईचा विवाह डॉ सखाराम राउत यांच्याशी लावून दिला. डॉ सखाराम राउत हे जे जे हॉस्पिटलमध्ये असिस्टंट सर्जन होते.
रखमाबाई यांचा संघर्ष –
रखमाबाईंचा विवाह वयाच्या ९व्या वर्षी दादाजी भिकाजी ठाकूर यांच्याशी त्यांच्या आईने लावून दिला. त्याकाळी मुलीने वयात येईपर्यंत आईवडिलांकडे राहण्याची प्रथा त्याकाळी होती.वयाच्या १८ वर्षांपर्यंत रखमाबाई माहेरीच राहिल्या. त्यानंतर १८३३ मध्ये दादाजीने त्यांना आपल्या घरी बोलावलं. मात्र दादाजी ठाकूर कोणतेच काम करत नव्हते, केवळ ऐषोआरामात जगत होते. तसेच रखमाबाईंना डॉक्टरकीचे शिक्षण घ्यायचे होते म्हणून त्यांनी सासरी नांदण्यास जाण्यास नकार दिला.
नांदण्यास तयार नसलेल्या रखमाबाईंवर त्यांचा पती दादाजी भिकाजी याने थेट न्यायालयात खटला भरला. तो जगभर गाजला. विशेष म्हणजे यात लोकमान्य टिळकांसारख्या थोर नेत्यानेही रखमाबाईंना विरोध केला. तरीही रखमाबाईंनी आणि त्यांच्या पित्याने खंबीरपणे हा लढा दिला. नांदायला जाणे किंवा ६ महिन्यांचा कारावास असा निकाल न्यायालयाने देताच रखमाबाईंनी कारावासाची शिक्षा भोगण्याची तयारी दाखवली मात्र नवऱ्याकडे जाण्यास स्पष्ट नकार दिला. अखेर तडजोड म्हणून दोन हजार रुपयांची भरपाई पतीला दिली व या विवाहातून स्वतःची सुटका करून घेतली आणि डॉक्टरीच्या दिशेने त्यांची वाटचाल सुरू झाली.
वैद्यकीय योगदान –
वयाच्या २२ व्या वर्षानंतर वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी १८८९ मध्ये वैद्यक शास्त्राच्या अभ्यासासाठी त्या इंग्लडला रवाना झाल्या. इंग्लडमध्ये कॅम्ब्रिजची परीक्षा आणि आर्ट्स चा एक वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करून इंग्लंड मध्ये १८९० मध्ये लंडन स्कूल ऑफ मेडिसिन फॉर विमेन या महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षणास प्रारंभ केला व १८९४ मध्ये शेवटची परीक्षा त्या उत्तीर्ण झाल्या. डॉ. रखमाबाई यांनी मुंबईच्या कामा हॉस्पीटलमध्ये आणि सुरत व काठेवाडमध्ये आयुष्यभर रूग्णसेवा केली. त्यांच्या सेवेबद्दल शासनाने त्यांना “कैसर ए हिंद “हा किताब देउन सन्मानित केलं .त्या आजन्म अविवाहीतच राहिल्या. वैद्यकीय व सामाजिक कार्यासाठी योगदान देणाऱ्या रखमाबाईंनी २५ डिसेंबर १९५५ रोजी वयाच्या ९२व्या वर्षी जगाचा निरोप घेतला.