आरोग्यनामा ऑनलाइन – मागील काही दिवसांपासून राज्यत उन्हाची तीव्रता खूपच वाढली आहे. दुपारी कामानिमित्त बाहेर पडणेही अवघड होऊन बसले आहे. या वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा त्रास होण्याचे प्रकारही वाढले आहेत. आतापर्यंत या उष्माघाताने तब्बल सातजणांचा बळी घेतला आहे. उष्मघातासह आरोग्याच्या अन्य समस्याही नागरिकांना भेडसावत आहेत. यासाठी राज्याच्या आरोग्य विभाग अॅलर्ट झालासून खास समिती स्थापन करण्यात आली आहे. तापमानातील बदलामुळे नागरिकांच्या आरोग्यावर काय परिणाम होत आहे, यावर ही समिती लक्ष ठेवणार आहे.
बदललेल्या वातावरणामुळे तापमान वाढले आहे. याचा नागरिकांच्या आरोग्यावर काय परिणाम होत आहे हे पाहण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्यात आली आहे. लवकरच या समितीद्वारे काम सुरु करण्यात येणार आहे. तापमानामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये यासाठी ही समिती उपाययोजना करणार आहे. वातावरण बदलल्याने पाण्यामार्फत पसरणाऱ्या आजारांचा धोका असतो. शिवाय कीटक, गोगलगाय यांच्यामार्फत आजार पसरू शकतात. तसेच या काळात मच्छरांपासून अनेक आजार होण्याची भिती असते. अशा सर्व गोष्टी समजून घेण्यासाठी स्थानिक पातळीवर काय परिणाम होतात याचा अभ्यास करण्यात आला आहे, अशी माहिती राज्याच्या संसर्गजन्य आजार विभागाचे प्रमुख डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली.