आरोग्यनामा ऑनलाईन टीम : ( शलाका धर्माधिकारी ) – आषाढ महिना संपून श्रावण महिना सुरु होतो त्या पूर्वी येणारी अमावास्या ही ‘दीप अमावास्या’ म्हणून ओळखली जाते. आजकाल विजेमुळे दिव्यांचा झगमगाट असतो परंतु पूर्वीच्या काळी तेल तुपाच्या दिव्यांचाच आधार होता. श्रावण म्हणजे पावसाने अंधारून येणार, म्हणून पूर्वतयारी करण्यासाठी महिला दिव्यांची स्वच्छता करत असे आणि अमावास्येच्या दिवशी त्यांची पूजा केली जात असे. तीच प्रथा पुढे पाळली जात आहे. हिंदू संस्कृतीमध्ये दिव्यांना विशेष महत्व आहे. त्यामुळे दिव्यांच्या अमावास्येला आणि लक्ष्मीपूजनाच्या अमावास्येला दिव्यांची पूजा करून आयुष्यातील अंधकार दूर कर अशी प्रार्थना केली जाते अशी मान्यता आहे.
देवघरात आजही प्रामुख्याने पितळ किंवा तांब या धातूचे दिवे अधिक वापरले जातात. स्टील आणि मातीच्या दिव्यांना सहजासहजी स्वच्छ करता येते. परंतु पितळ आणि तांब्याच्या दिव्यांची विशेष स्वच्छता केली जाते. रोज देवघरात लावलेला दिवा अधिक काजळी धरतो आणि तेलाने चिकट थर साचतो. हा थर स्वच्छ करणे कठीण असते. मात्र हे दिवे स्वच्छ आणि चकचकीत साफ करण्यासाठी काही उपाय आहेत. जाणून घ्या त्याबद्दल –
१. सर्व दिवे प्रामुख्याने ज्या दिव्यांचा वापर रोज होतो ते दिवे आदल्या रात्री किंवा सफाई करण्याच्या १ तास आधी गरम पाण्यात पूर्ण मोकळे करून भिजत ठेवा.
२. या पाण्यात व्हिनेगर किंवा पूर्ण १ लिंबू पिळा.
३. या पाण्यात लिक्विड सोप किंवा शाम्पू टाकून दिवे पूर्ण भिजतील एवढे पाणी ठेवा.
४. गरम पाणी आणि लिंबाने तेलाचा थर मऊ होऊन सहज साफ करता येतो.
५. लिंबाची साल किंवा चिंचेचा कोळ आणि अगदी पितांबरीने देखील आता दिवे स्वछ आणि चकचकीत साफ होतील.
६. घरातील गॅसचे बर्नर देखील आठवड्यातून एकदा या पद्धतीने साफ केल्यास ते काळे पडणार नाहीत आणि ज्योत पूर्णपणे बाहेर पडेल.