आरोग्यनामा ऑनलाइन टीम – टाटा आणि केईएम रुग्णालयात मुंबईबाहेरील अनेक रुग्ण कॅन्सरवर उपचार घेण्यासाठी येतात. त्या रुग्णांच्या नातेवाईकांना हाफकिन संस्थेमध्ये निवारा केंद्र उभारणार असल्याची माहिती नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी विधान परिषदेत दिली.अनेकदा रूग्ण आणि नातेवाईकांना नाईलाजास्तव रस्त्याच्या कडेला मुक्काम करावा लागतो. राज्य सरकारच्या निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास रूग्ण आणि नातेवाईकांच्या निवाऱ्याचा प्रश्न आता सुटणार आहे. कॅन्सरग्रस्तांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी लवकरच हाफकिन इन्स्टिट्युटमध्ये निवारा केंद्र उभारण्यात येणार आहे.
मुंबईत उपचार घेणाऱ्या कॅन्सरग्रस्तांच्या नातेवाईकांच्या निवाऱ्याबाबत विधान परिषदेचे सदस्य किरण पावसकर यांनी विधान परिषदेत लक्षवेधी सूचना केली. यावेळी नगरविकास राज्यमंत्री योगेश सागर यांनी उत्तर देताना सांगितले की,कॅन्सरग्रस्तांच्या नातेवाईकांना राहण्यासाठी लवकरच हाफकिन इन्स्टिट्युटमध्ये निवारा केंद्र उभारण्यात येणार आहे. याबाबतची प्रक्रिया सुरू झाली असून सात एकर जागेवर हे निवारा केंद्र उभारण्यात येणार आहे. तेथे रुग्णांच्या ३०० नातेवाईकांची सोय होणार आहे. पालिकेच्या केईएम आणि टाटा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांसाठी हाफकिन इन्स्टिट्युटच्या मोकळ्या जागेत तात्पुरते निवारा केंद्र उभारण्यात येत असून याबाबत प्रक्रिया सुरू आहे.
मुंबईत टाटा, केईम, जे. जे. व अन्य मोठ्या रूग्णालयात राज्यभरातून रूग्ण येत असतात. या रूग्णांना हॉस्पिटलमध्ये प्रवेश मिळवे पर्यंत आणि उपचार पूर्ण होईपर्यंत अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. रूग्ण हॉस्टिपलमध्ये अॅडमिट झाल्यानंतर नातेवाईकांचे हाल सुरू होतात. त्यांना कुठेच निवारा नसल्याने रस्त्याच्या कडेला आश्रय घ्यावा लागतो. रूग्णालयाच्या आवारात काहीजण मुक्काम ठोकतात. परंतु, अनेकदा तेथूनही हाकलले जाते. अशी मानहानी आणि त्रास सोसत दुसरीकडे रूग्णासाठी धावपळ सुरू असते. सध्या कॅन्सर पेशंट आणि त्यांच्या नातेवाईकांच्या प्रश्नावर आवाज उठवला जात असला तरी एकुणच सर्व रूग्णालयात रूग्णाच्या नातेवाईकांचे अतिशय हाल होत असतात. शिवाय, रूग्णालयातील सुरक्षा कर्मचारी आणि अन्य कर्मचारी अतिशय वाईट वागणूक त्यांना देत असतात. कॅन्सर रूग्णांच्या नातेवाईकांसाठी राज्य सरकारने घेतलेला निर्णय चांगला असला तरी त्याची अंमलबजावणी होणे गरजेचे आहे.