आरोग्यनामा ऑनलाइन टीम – मुंबईत रक्ताची मागणी कमी झाली आहे, असे कारण पुढे करत शासनाने मोठा गाजावाजा केलेली ब्लड ऑन कॉल ही योजना मुंबईतून गंडाळली. शिवाय, या योजनेचे राज्यातही तिन तेरा वाजले आहेत. त्यामुळे या प्रकाराचे पडसाद विधानसभेत उमटले. यासंबंधी प्रश्न विचारण्यात आल्यानंतर राज्याचे आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे यांनी मागणी वाढली तर योजना पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन दिले आहे.
रक्ताची गरज असलेल्या रुग्णाला तातडीने रक्त उपलब्ध व्हावे, यासाठी राज्याच्या आरोग्य विभागाने २०१३ मध्ये सातारा येथे प्रायोगिक तत्वावर ब्लड ऑन कॉल ही योजना सुरू केली होती. नंतर ही योजना संपूर्ण राज्यात सुरू करण्यात आली. परंतु, एप्रिल २०१९ पासून मुंबईत ही योजना बंद करण्यात आली. याबाबत विधासभेत विचारण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, मुंबई आणि परिसरात रक्ताचा तुटवडा भासत नाही.
त्यामुळे ब्लड ऑन कॉल योजना या ठिकाणी बंद केली आहे. परंतु, भविष्यात येथे रक्ताची मागणी वाढल्यास ही योजना पुन्हा सुरू करण्यात येईल. जे. जे. महानगर रक्तपेढीची रक्तपिशवी साठवणूक क्षमता १० हजार युनिट असून दर महिन्याला अडीच ते तीन हजार युनिट रक्त संकलित होते. या रक्ताचे विलगीकरण करून अंदाजे नऊ हजार रक्त घटक तयार करून साठवणूक करण्यात येत आहेत, असे एकनाथ शिंदे म्हणाले.