आरोग्यनामा ऑनलाईन टीम- प्लाज्मोडियम नावाच्या पॅरासाइटमुळे मलेरिया हा आजार होतो. मलेरिया झाल्यानंतर काळजी न घेतल्यास त्याचा त्रास वाढू शकतो. काहीजण मलेरियाचा ताप आल्यास केमिस्टला विचारून औषध घेतात. या चूकीमुळे जीवावरही बेतू शकते. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अशाप्रकारे कोणतेही औषधे घेऊ नये. केमिस्टने एस्प्रिनसारखी ताप कमी करणारी औषधे आणि ब्रूफेन, कॉम्बिफ्लेमसारख्या पेनकिलर दिल्यास आणि जर डेंग्यू असेल तर या औषधांमुळे प्लेटलेट्स कमी होतात. अनेकदा या औषधांमुळे महिलांना जास्त रक्तस्राव होतो. तसेच मलेरियाचा ताप उतरल्यावर डॉक्टरांनी दिलेली औषधे घेणे बंद केल्यास पुन्हा मलेरिया होऊ शकतो.
खूप ताप असल्यावर अनेकजण अंगावर चादर घेऊन झोपतात. घाम येऊन ताप उतरेल असे त्यांना वाटते. मात्र, शरीराला झाकून ठेवल्यामुळे तापमान वाढू शकते. उलट रुग्णाला मोकळी आणि ताजी हवा मिळाली पाहिजे. रूग्णाला कमी एसी, कूलर आणि पंख्यामध्ये ठेवले तरी चालेल. यामुळे ताप उतरण्यास मदत होते. अनेकदा ताप असल्याने रुग्णाला अंघोळही करू दिली जात नाही. मात्र, रुग्ण कोमट पाण्याने अंघोळ करू शकतो. अंघोळ करू शकत नसेल तर टॉवेल ओला करून अंग पुसून घ्यावे.
मलेरियाचा ताप आला असल्यास आराम केला पाहिजे. काहीजण ३-४ दिवसानंतर काम सुरू करतात. पण तापामध्ये आराम खूप आवश्यक आहे. या तापामध्ये कमीत कमी एक आठवडा आराम केला पाहिजे. यामुळे मलेरियापासून आराम मिळण्यास मदत होते. जर व्यायाम करत असाल तर १५ दिवसानंतर व्यायाम सुरू करा. मलेरिया दोन आठवड्यात बरा होतो.