आरोग्यनामा ऑनलाइन टीम – दम्याच्या रूग्णांना वातावरणात बदल झाल्यास अनेकदा त्रास होतो. वातावरणात असलेले इरिटेट करणाऱ्या घटकांमुळे कफ अथवा पडशासारखा त्रास सुरू होतो. अशी स्थिती दम्याच्या रूग्णास हानिकारक असू शकते. दम्याच्या रुग्णांचा त्रास का वाढतो, याविषयी माहिती जाणून घेवूयात.गॅस अप्लायन्ससेसमधून निघणाऱ्या नायट्रोजन डायऑक्साइडमुळे दम्याच्या रुग्णांना त्रास होऊ शकतो. संशोधकांनी १५० मुलांवर केलेल्या संशोधनातून असे असे समोर आले की, घरात राहिल्यामुळे त्यांना कफ व छातीत आकस अशा समस्यांचा त्रास सहन करावा लागतो. गॅस स्टोव्ह व हिटरचा वापर केल्यामुळे सुद्धा नायट्रोजन डायऑक्साइड उत्सर्जित होतो. त्यामुळे व्हेंटिलेयशनची योग्य व्यवस्था असणे आवश्यक आहे.
तसेच पॅराफिन-बेस्ड मेणबत्ती पेटवल्यानंतर वातावरणात मिसळणारी रसायने दम्याच्या रुग्णांसाठी हानिकारक असतात, असेही एका संशोधनात आढळून आले आहे. मेणबत्त्या विशिष्ट प्रसंगीच वापरल्या जात असल्या तरी त्याचा त्रास होतो. म्हणून मधमाशांच्या पोळातून निघणारे मेण आणि सोयाबीनपासून तयार केलेल्या मेणबत्तीचा वापर करावा. यामुळे दम्याच्या रूग्णाला त्रास होणार नाही. तसेच लेसर प्रिंटर्स व फोटो कॉपी मशीनमधून उत्सर्जित होणारे अल्ट्राफाइन पार्टिकल्सही श्वसन प्रक्रियेत हानिकारक असतात.
दम्याच्या रुग्णांनी कार्यालयात काम करताना त्यांच्या आसपास प्रिंटर वा फोटो कॉपी मशीन नसावी,असा सल्ला तज्ज्ञ देतात. आतषबाजीचे वातावरण दम्याच्या रूग्णासाठी त्रासदायक असते. अशा वेळी रूग्णास श्वासोच्छ्वास खूप त्रास होतो. श्वास गुदमरतो आणि जीव घाबरल्यासारखा होतो. फटाके फोडल्यानंतर सल्फर डायऑक्साइडसारखी घातक रसायने वातावरणात पसरतात. ही रसायने दम्याच्या रूग्णासाठी खूप घातक असतात. तसेच स्वयंपाक करताना गव्हाचे पीठ जपून काढावे. यामुळे दम्याच्या रुग्णांना त्रास होऊ शकतो. पीठ श्वासोच्छ्वासाद्वारे नाकात गेल्यास फुप्फुसांच्या कार्यप्रणालीत अडथळा येऊन दम्याच्या रूग्णास त्रास होण्याचा धोका असतो.