आरोग्यनामा ऑनलाइन – वजन बेसुमार वाढले की कोणकोणते त्रास होतात हे आफ्रिकेच्या मलावीतील ३९ वर्षांच्या इक्बाल खानकडे पाहिले की समजते. तो वाहतूक व्यवसायात कार्यरत आहेत. वजन २२२ किलोपर्यंत पोहोचल्यानंतर इक्बाल खानला घराबाहेर पडणेही अशक्य झाले होते. एवढेच नाही तर उभे राहिल्यानंतर त्याचा तोल जाऊ लागला होता. श्वास घेण्यास त्रास होणे, शरीरातील ऑक्सिजन कमी होणे, असा समस्यांना त्याला तोंड द्यावे लागत होते. अखेर त्याने भारतात येऊन उपचार करण्याचे ठरवले आणि तो सुरतमधील एका रूग्णालयात दाखल झाला. आता त्याने ३२ किलो वजन कमी केले असून लठ्ठपणामुळे होणारा त्रासही थोडा कमी झाला आहे.
वजन वाढल्याने इक्बाल यास अन्य आजार होण्याचाही धोका वाढला होता. यामुळे कुटुंबाने त्याचे वजन नियंत्रणात आणण्यासाठी भारतात येण्याचा निर्णय घेतला. गुजरातच्या सुरतमधील किरण मल्टिसुपर स्पेशालिटी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले. या रुग्णालयातील बेरियाटिक सर्जन डॉ. धर्मेश धनानी यांच्यासह बेरियाटिक आणि लेप्रोस्कोपिक सर्जन डॉ. चिंतन पटेल यांनी बायोमेडिकल विभाग आणि अनेस्थेशिया विभागातील तज्ज्ञ डॉक्टरांच्या मदतीने ही शस्त्रक्रिया केली.
वजन कमी करण्यासाठी ही व्यक्ती रुग्णालयात आली होती. २२२ किलो वजन असल्याने रुग्णाला कुठल्याही आधाराविना चालता येत नव्हते. कुटुंबाच्या परवानगीनुसार या रुग्णावर बेरियाटिक शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर महिनाभरात रुग्णाची परिस्थिती सुधारू लागली. त्याचे वजन ३२ किलोने कमी झाले. आता त्याचे वजन १९० किलो असून त्यास व्यवस्थित चालतादेखील येत आहे. त्यास काही दिवस लिक्विड डाएटवर ठेवण्यात आले होते. आता जेवणात पथ्य पाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्याच्या वजनात आणखी घट होणार आहे. या रुग्णालयात आतापर्यंत अनेक रुग्णांवर बेरियाटिक शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र दक्षिण गुजरातमध्ये सर्वाधिक लठ्ठ व्यक्तीवर बेरियाटिक शस्त्रक्रियेचे हे पहिलेच प्रकरण आहे, असे सुरत येथील किरण मल्टिसुपर स्पेशालिस्टी रुग्णालयातील बेरियाटिक आणि लेप्रोस्कोपिक सर्जन डॉ. चिंतन पटेल यांनी सांगितले.