आरोग्यनामा ऑनलाईन टीम – पावसाळा सुरु झाला की वातावरणात बदल होतोच. बदलत्या वातावरणामुळे सर्दी , खोकला , ताप यांसारखे साथीचे आजार पसरतात. त्यामुळे या दिवसांमध्ये आरोग्याची काळजी घेणं अधिक गरजेचं आहे. मात्र हे आजार होण्यापूर्वीच जर आपण आहारात योग्य पदार्थांचा समावेश केला तर हे साथीचे आजार टाळता येऊ शकतात.
आलं –
आलं हे चवीला जरी तिखट असले तरी ते आपल्या आरोग्यास अत्यंत उपयुक्त आणि पचनास हलके असते. सर्दी खोकला साठी सुद्धा आलं उपयुक्त आहे.अजिर्ण, आव, सूज, संधीवात, बद्धकोष्ठता, डोकेदुखी, सर्दी, खोकला, दमा, हृदयरोग इत्यादी सर्व रोगांवर आले हा उत्तम उपाय आहे. तापानंतर खूप थकवा आला असल्यास, तोंडाला चव नसल्यास, मळमळत असल्यास किंवा शरीर दुर्बलता यामुळे चिडचिड होत असेल तर आले किसून त्यावर लिंबू पिळावे आणि खडीसाखर मिसळावी. असे हे आल्याचे पाचक रोज थोडे थोडे खावे. ज्याचा आपल्या शरीराला अप्रतिम लाभ होतो.
गवती चहा –
गवती चहामध्ये अँटिऑक्सिडंट्सचा पण भरपूर प्रमाणात समावेश असतो. सर्दी-पडसे असेल तर गवती चहा प्यावा. ताप आला असेल तर गवती चहाची भरपूर पाने घालून चहा प्यावा. याने खूप घाम येऊन ताप उतरतो.
सर्दी झाली असेल तर गवती चहात पुदिना, दालचिनी, आलं समप्रमाणात घेऊन त्यात पाणी आणि गूळ मिसळून काढा तयार करा. हा काढा रोज रात्री एक कप् प्यावा व उबदार पांघरून घेऊन झोपावे. यामुळे जुनाट सर्दी-पडसे कमी होते.
लसूण –
एका लसणाच्या ४ कुड्या तीस ग्राम मोहरीच्या तेलामध्ये टाका. तेल थोडे गरम करा आणि त्या तेलाने मालिश करा डोके दुखणे थांबेल. बदलणा-या वातावरणाचा सर्वच वयोगटातील लोकांना कफ किंवा सर्दीचा त्रास होतो. लसणाचे नियमित सेवन केल्यास अशा आजारांपासून सहज मुक्तता होऊ शकते.
तुळस
तुळशीचा चहा हा सर्दी-खोकला यावर प्राथमिक उपाय आहे. तुळशीची ताजी पाने धुवून घेऊन ती बारीक करावीत आणि एक कप पाण्यात घालावीत. त्यात सुंठ, इलायची पावडर हे पदार्थ घालावेत. हे मिश्रण उकळून घ्यावे. शरीराला ऊर्जा पुरवण्याचे काम तुळशीचा चहा करतो.
तसेच २ चमचे तुळसीचा रस, एक चमचा मध दिवसातून ३ ते ४ वेळा घ्यावा. अशा तापाबरोबर असणारे सर्दी, खोकला, डोकेदुखी, अंगदुखी इत्यादी लक्षणेही तुळशीमुळे कमी होतात. पावसाळ्यात तुळस आपली रोग प्रतिकारक शक्ती वाढवत असते. रोज ५ तुळशीचे पानं खाल्याने आपले शरीर निरोगी राहण्यासाठी मदत होते.
दालचिनी –
चिमुटभर दालचिनी पूड पाण्यात उकळून त्यात चिमुटभर मिरीपूड आणि मध टाकून घेतले असता जुनाट सर्दी, सुजलेला घसा आणि मलेरिया कमी होतो. खोकला झाला असेल, तर दालचिनी पावडर १ चमचा व मिरपूड अर्धा चमचा घेऊन हे मिश्रण कोमट पाण्यात एकत्रित करून दिवसभातून २ वेळा प्यावे.
लिंबू
लिंबामध्ये अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असते. त्यासोबतच त्याच्या सेवनामुळे पोटाचे कार्य सुरळीत चालते. लिंबामध्ये रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्याची क्षमता असते. त्यामुळे या दिवसामध्ये लिंबू सरबताचे सेवन करावे.
हळद –
रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्याचं एक विलक्षण सामर्थ्य हळदीत आहे. हळद रक्त शुद्ध करते आणि रक्तातील साखरेचे प्रमाण सुद्धा नियंत्रित ठेवते. खोकल्या झाल्यास एक कप कोमट दुधामध्ये एक चमचा हळद आणि चिमुटभर सुंठ पावडर टाकून ते प्यावे.