पुणे : आरोग्यनामा ऑनलाइन – शरीराचे आरोग्य राखण्यासाठी आपण विविध प्रकारचे काळजी घेतो. यामध्ये आहार-विहार यास खूप महत्व आहे. आहारात काय घ्यावे, काय घेवू नये याबाबत आपण बरीच माहिती मिळते. यापैकी महत्वाचे म्हणजे आहारात फळांचा समावेश केल्यास आपले आरोग्य आणखी चांगले राहू शकते. फळांमध्ये असे काय असते ज्यामुळे आपल्याला चांगले आरोग्य लाभू शकते. शिवाय कोणत्या फळांमध्ये कोणते घटक असतात ज्यामुळे शरीराला पोषक घटक उपलब्ध होऊ शकतात. याविषयी आपण माहिती घेणार आहोत.
उन्हाळ्यात तर पाणीदार फळांचे आवर्जून सेवन केले पाहिजे. कलिंगड, काकडी, टरबूज इत्यादी फळांमध्ये मोठ्याप्रमाणात पाणी असते. यामुळे अशी फळे उन्हाळ्यात खावीत. यामुळे शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढली जाते. रक्ताचं शुद्धीकरण होतं. शरीराची अंतर्गत स्वच्छता करण्याचं काम फळातील पाणी करू शकतं. फळांमध्ये मोठ्या प्रमाणात तंतुमय पदार्थ असतात. त्यामुळे अपचनाचा त्रास होत नाही किंवा अपचनाने पोटात दुखणं, बद्धकोष्ठता, आतड्यांच्या समस्या हे विकार जडत नाहीत. पेरू कफवर्धक असला तरी मलप्रवृत्ती साफ करण्यास उपयुक्त आहे.
तर अंजीर हे पित्तशामक असून रक्तातील हिमोग्लोबिन वाढविण्यास मदत करतं. लिंबे, संत्री, मोसंबीमध्ये क जीवनसत्व असल्याने अन्नपचन होण्यास मदत होते. आवळा, लिंबू, संत्री, मोसंबी आणि अन्य काही फळात क जीवनसत्व मोठ्या प्रमाणात असतं. सर्दी कमी करण्यास क जीवनसत्व उपयुक्त ठरतं कफ, वात, पित्त याचा त्रास असणाऱ्या व्यक्तीसाठी नारळ आणि नारळपाणी हे खुपच फायदेशिर आहे. नारळातील खोबरे आणि नारळ पाणी यामध्ये प्रथिने, कार्बोहाडेट्स असतात. आजारपणात नारळपाणी पिण्याचा सल्ला दिला जातो काराण नारळ म्हणजे पोषकद्रव्यांनी परिपूर्ण असा समतोल आहार आहे. सफरचंद सेवनाने डोकेदुखी आणि नैराश्य कमी होण्यास मदत होते. संधिवातावरही ते उपयोगी ठरते. सफरचंद शरीराची ताकद आणि रोगप्रतीकारक शक्ती वाढविण्यास उपयुक्त ठरते. सफरचंदामुळे शौचाच्या तक्रारी कमी होतात आणि पचनशक्ती सुधारते. द्राक्षांमुळे पित्तदोष कमी होतो. द्राक्षं खाल्ल्याने थकवा कमी होतो.
डाळिंबात ग्लुकोजसारखी चटकन पचणारी साखर असते. डाळिंब दाण्यातील रस रक्तवर्धक असून त्याचा लॅक्टींग एजंट म्हणून म्हणजेच मातेला दूध वाढवण्यासाठी उपयोग होतो. डाळिंब पित्तनाशक असल्यामुळे पित्ताच्या तक्रारीवर उत्तम ठरते. डाळिंबाने वातदोषाचे शमन होते. हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते. डाळिंबाने मलप्रवृत्ती सुधारून शौचास साफ होण्यास मदत होते. केळी सर्व ऋतूत उपलब्ध होतात. केळ्यामध्ये ७० टक्के पाणी, ०.८ टक्के खनिज द्रव्यं, ०.४ टक्के तंतुमय पदार्थ, प्रथिनं आणि जीवनसत्त्वे असतात. शिवाय कॅल्शियम, लोह, फॉस्फरस असतात. कॅल्शियममुळे हाडे व स्नायू मजबूत होण्यास मदत होते. केळातील साखर पचनास सुलभ असल्याने थकवा निधून जातो.