आरोग्यनामा ऑनलाइन टीम – आकस्मिक गर्भपात झाल्यास महिलांनी काळजी घेतली पाहिजे. अनेकदा गर्भपात करावा लागतो अथवा डॉक्टर करण्यास सांगतात. अशा वेळी महिला शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या संवेदनशील झालेल्या असतात. अशावेळी त्यांच्या खाण्या-पिण्याकडे विशेष लक्ष द्यावे. त्याच्या शरीराला आवश्यक असे पदार्थ सेवन केल्यास यामुळे होणारा त्रास टाळता येऊ शकतो.
अकस्मिक गर्भपात झाल्यास अथवा करावा लागल्यास त्यानंतरच्या काळात भरपूर पेय पदार्थांचे सेवन करावे. कारण अशक्तपणामुळे महिला पुरेसे जेवण करू शकत नाहीत. तसेच पातळ खाद्यपदार्थांचे सेवन केल्याने शरीराला कमी मेहनत करावी लागते. या काळात महिलांनी काही दिवसांसाठी व्यायाम करण्याचे टाळावे. अशा स्थितीत कमीत कमी दोन आठवडे आराम करावा. तसेच नोकरदार महिलांनीही याकडे विशेष लक्ष द्यावे.
तसेच डॉक्टरांनी सांगितलेल्या अँटिबायोटिक्सचे सेवन नियमित करावे. आहारात भरपूर जीवनसत्त्वांचा समावेश करावा आणि भरपूर झोप घ्यावी. या काळात शरीर अत्यंत अशक्त बनते, त्यामुळे कष्टाचे काम करू नये. तज्ज्ञांच्या मते सुमारे दोन आठवडे १५ पौंडांपेक्षा जास्त वजन उचलू नये. आकस्मिक गर्भपात झाल्यानंतर शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या निरोगी झाल्यावरच पुढच्या अपत्याच्या तयारीला लागावे.