आरोग्यनामा ऑनलाईन टीम – सैन्य दलासाठी वापरण्यात येणारी औषधे बाजारात बेकायदेशीरपणे विक्री केल्याने २७ औषध कंपन्यांचा परवाना राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाने रद्द केला आहे. यामध्ये मुंबईतील २०, पुण्यातील पाच आणि रायगड जिल्ह्यातील दोन औषध कंपन्यांचा आहे.
सैन्यदल आणि सरकारी रुग्णालयांसाठी तयार केलेली औषधे बाजारात उघडपणे विकणाऱ्या राज्यातील २७ औषध उत्पादक कंपन्यांवर कारवाई करून त्यांचा परवाना रद्द करण्यात आला आहे. अन्न आणि औषध प्रशासनाच्या या कारवाईमुळे औषध कंपन्या हादरल्या आहेत. औषध कंपन्यांच्या गोरखधंद्याच्या तक्रारी अन्न आणि औषध प्रशासनाकडे आल्या होत्या. त्यानुसार एफडीएने कारवाई करून मुंबई, ठाणे आणि पुणे येथे धाड टाकून तब्बल ४० लाख रुपये किमतीचा औषधांचा साठा जप्त केला.
संरक्षण दलासाठी तयार केलेल्या औषधांवर विक्रीसाठी नाही, असा मजकूर लिहिलेला असतो. पण हा मजकूर खोडून आणि किमतींमध्ये फेरफार करून ही औषधे विकली जात असल्याचे आढळले होते. त्यामुळे या औषधांवरील एमआरपी काढून टाका अशी मागणी केंद्र सरकारकडे एफडीए करणार आहे, अशी माहिती एफडीएच्या आयुक्त डॉ. पल्लवी दराडे यांनी दिली.दरम्यान, सैन्यदल आणि सरकारी रुग्णालयांसाठी असलेल्या औषधांची बेकायदा विक्री केलेल्या औषध कंपन्यांचा परवाना रद्द केला आहे.
आता या कंपन्यांनी परवाना मिळवण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली आहे. या औषध कंपन्यांनी नियमांचे उल्लंघन करत गुन्हा केला आहे. या गुन्ह्याला माफी देऊ नये अशी आमची मागणी आहे, असे ऑल फूड अँण्ड ड्रग्ज लायन्सेस होल्डर फाऊंडेशनचे अध्यक्ष अभय पांडे यांनी म्हटले आहे.